(पान ९ ला मेन)
KSE26B01805
साक्री : येथील आगारात विद्यार्थ्यांसोबत संस्थाध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे, मुख्याध्यापक व कर्मचारी.
--------
वेळेवर बस उपलब्ध न झाल्यास ठिय्या आंदोलन
साक्री आगारावरला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा मोर्चा; शैक्षणिक नुकसान थांबविण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कासारे, ता. २५ : तामसवाडी (ता. साक्री) येथील खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत ये- जा करण्यासाठी वेळेवर बस सेवा उपलब्ध होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या समस्येच्या निषेधार्थ विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी गुरुवारी साक्री बस आगारावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. वेळेवर बस उपलब्ध न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी झाले होते. मोर्चा साक्री बस आगारात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक सुनील महाले यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. विद्यार्थ्यांनी सांगितले की, बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शाळेची प्रार्थना तसेच पहिला तास नियमितपणे चुकतो. परिणामी अभ्यासाचे नुकसान होत असून शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुख्याध्यापक प्रवीण नांद्रे यांनीही यापूर्वी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे या समस्येबाबत पाठपुरावा केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला. पालकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे प्रा. प्रकाश सोनवणे यांनी सांगितले. मोर्चादरम्यान विद्यार्थी व पालकांच्या वतीने मागण्यांचे निवेदन आगार व्यवस्थापक सुनील महाले यांना देण्यात आले. यानंतर महाले यांनी वाहतूक नियंत्रक आणि संबंधित कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच विभाग नियंत्रक वसीम पठाण यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांसाठी बस सेवा नियमित करण्याच्या सूचना दिल्या.
येत्या २९ जूनपासून बस वेळेवर उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन महाले यांनी दिले. मात्र, दिलेले आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले नाही तर विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रा. प्रकाश सोनवणे यांनी दिला.
या वेळी डॉ. प्रा. रत्नमाला सोनवणे, मुख्याध्यापक प्रवीण नांद्रे, नंदलाल खैरनार, वंदना सोनवणे, जिभाऊ मासुळे, संतोष वाघमोडे, नागू सोनवणे, दंगल अहिरराव, कैलास अहिरे, सुभाष सोनवणे यांच्यासह सय्यदनगर परिसरातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.