पान तीन मेन
----------------
15063
मालेगाव : पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले, समवेत शिक्षण मंत्री दादा भुसे, भारत जगताप.
----
राजकारण न करता पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या
रामदास आठवले : मालेगावला इंधन बचतीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मालेगांव, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील परिस्थिती लक्षात घेता पेट्रोल डिझेलची बचत करावी असे आवाहन जनतेला केले आहे. त्यामुळे विराेधी पक्षाने राजकारण न करता, सर्वानी देशाबरोबर खंबीरपणे उभे राहावे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. मी ज्यांच्या बरोबर जातो त्यांना सत्ता मिळते असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री आठवले शुक्रवारी ( ता. १५ ) मालेगाव दौऱ्यावर होते. त्यांनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शुभारंभ करून मालेगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भरत जगताप, तालुकाध्यक्ष दादाजी महाले, नाना अहिरे, किरण पगारे, मधुकर भालेराव, सनी खरे, अमाेल मोरे, अनिल अहिरे, दिनेश शेजवळ, नीलेश बहाळकर, अभिषेक जगताप, आदी उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, की अमेरिका व इराणच्या युद्ध देशात पेट्रोल डिझेलची कमतरता जाणवू लागली आहे. इंधनाची बचत सर्वांनी करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या ताफ्यातील वाहने कमी करून जनतेला आगळा-वेगळा संदेश दिला आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री यांनी देखील दुचाकी व इतर वाहनाने प्रवास केला आहे. नागरिकांनी गरज पडल्यास सार्वजनिक साधनांचा वापर करावा.
नीटच्या पेपर फुटीतील आरोपींना कठोर शासन केले जाणार आहे. अशा कृत्यामुळे मुलांचे मोठे नुकसान होते. पुन्हा असे कृत्य होवू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजे असेही ते म्हणाले.
----------------
मेनजवळ स्वतंत्र लावावी
----------------------------
चांदवडला कार्यकर्ता मेळावा
गणूर : ‘जगात युद्ध नको, बुद्ध हवा, हीच भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. देश आर्थिक आव्हानांना सामोरे जात असला तरी भारताची अर्थव्यवस्था लवकरच जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. शुक्रवारी (ता.१५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या नाशिक जिल्हा ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात चांदवडला बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय भालेराव होते.
यावेळी काकासाहेब खंबाळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, अमोल पगारे, जाबीर पठाण, रामबाबा पठाडे, अनिल केदारे, ताराचंद अहिरे, उमेश जाधव, रवी जाधव, ॲड. विकास जाधव, ॲड. शिवाजी धुळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री आठवले म्हणाले, की रिपब्लिकन चळवळीत अनेक गट असले तरी सर्व नेते आपलेच आहेत. मी कुणावरही टीका करत नाही. आंबेडकरी विचार केवळ वस्त्यांपुरते मर्यादित न राहता समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. माझ्यातील कार्यकर्ता हा मंत्रीपदापेक्षाही मोठा आहे. चांदवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली.
प्रास्तविकमध्ये प्रकाश जाधव यांनी दलित पँथर चळवळीच्या आठवणी जागवत सामाजिक न्याय विभागामार्फत महिलांच्या सबलीकरणासाठी अधिक प्रभावी योजना राबवण्याची गरज व्यक्त केली. दुष्काळग्रस्त चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा तसेच सिद्धार्थ हॉस्टेल उभारणीसाठी मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. मोहन यशवंते यांनी सूत्रसंचालन केले.