फोटाे -15321
मालेगाव : पोलिस ठाण्यात आंदोलन करतांना नगरसेवक खालीद शेख, समवेत मृत मुजम्मीलच्या दोन्ही मुली
----
फोटो -15322
मुजम्मील हुसेन
-----
वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
----------------------------
भरपाईसाठी धरणे, पंधरा दिवसातील सहावी घटना
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २३ : येथील रमजानपुरा भागातील एका तरुणाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मालेगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसांतील ही सहावी घटना असल्याने संतप्त नागरिकांनी रमजानपुरा पोलिस ठाणे आणि सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाजवळ धरणे आंदोलन केले. वीज वितरण कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
रमजानपुरा येथील अमिनाबाद परिसरात राहणारे मुजम्मील हुसेन अब्दुल मुकादम (वय ३८) यांच्या आत्याचे निधन झाले होते. त्यांच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होत असल्याने तसेच पावसाळी वातावरण लक्षात घेऊन त्यांनी घराजवळ मंडप उभारण्याचा निर्णय घेतला. मंडप उभारताना त्यांनी लोखंडी बांबू हातात घेतला असता, घराजवळून गेलेल्या ११ हजार केव्ही क्षमतेच्या उच्चदाब विद्युत वाहिनीचा त्याला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार वीजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ वीजपुरवठा खंडित करून त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी तसेच १२ आणि ६ वर्षांच्या दोन मुली असा परिवार आहे.
घरातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत नागरिकांनी रमजानपुरा पोलिस ठाणे, सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी इस्लाम पक्षाचे गटनेते खालीद शेख आणि सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख यांनी मृताच्या पत्नी व मुलींना २० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
सुमारे दोन तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर खासगी वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमसिंग आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर कंपनीने मंगळवारी (ता. २३) मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. उर्वरित मदतीबाबत तपास पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत आयशानगर कब्रस्तानमध्ये दफनविधी केला. यावेळी नगरसेवक सगीरुद्दीन, सादीक मेंबर, मुन्ना मेंबर, करण चव्हाण, जब्बार शेख, नाजीर हुसेन, एजाज खाटीक आदी उपस्थित होते.
चौकट
पंधरा दिवसांत सहावी घटना
शहरातील वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी ११ हजार केव्ही आणि ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिन्या जमिनीपासून अवघ्या दहा ते बारा फूट उंचीवर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत वीजेचा धक्का लागून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.