फोटो -15330
मालेगाव : मोसम नदीत साचलेला कचरा व काळे झालेले पाणी
----
मेन
मोसम नदीच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त
------------------------------
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नदीला कचराकुंडीचे रुप
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २४ : शहरातून वाहणारी मोसम नदी रक्तमिश्रित पाण्याच्या प्रश्नामुळे यापूर्वी राज्यभर चर्चेत आली होती. अधिवेशनातही या विषयावर चर्चा झाली होती. आता नदीपात्रात साचलेले सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि विविध स्रोतांमधून सोडले जाणारे प्रदूषित पाणी यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मोसम नदी ही शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारी प्रमुख नदी आहे. नदीकिनारी कॅम्प परिसरापासून झांजेश्वरपर्यंत दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत. या वसाहतींमधील गटारींचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील कथित रक्तमिश्रित पाणी तसेच द्याने परिसरातील काही उद्योगांमधून रासायनिक घटकयुक्त पाणी नदीत मिसळत असल्याचेही सांगितले जात आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाणी काळवंडले असून नदीकाठच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असून नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गटारींमध्ये टाकण्यात येणारा प्लास्टिक कचरा, कप, खाद्यपदार्थांची पाकिटे आदी साहित्य पावसाच्या पाण्यासह नदीपात्रात जमा होते. पावसाळ्यात नदीला मोठा पूर आल्यानंतर हा कचरा पुढे वाहून जात असला तरी उर्वरित काळात नदीपात्रातच साचून राहतो. त्यामुळे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होत आहेत.
मोसम नदीच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी निधी उपलब्ध होत असला तरी नदीपात्रातील स्थिती पाहता या कामांच्या परिणामकारकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महापालिका प्रशासनाने नियमितपणे नदीपात्राची स्वच्छता करून प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट
नदी की कचरा कुंडी
शहरात कोंबडी मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने काही व्यावसायिकांकडून कोंबड्यांचे पंख, कातडी आणि इतर अवशेष मोसम नदी तसेच ओवाडी नाल्यात टाकले जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याशिवाय सामान्य रुग्णालयातील काही वैद्यकीय कचरा, बँडेज पट्ट्या आणि अन्य साहित्यही नदीपात्रात आढळून येत असल्याचे सांगितले जात आहे. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कोट
शासनाने नाशिकच्या गोदावरी नदीप्रमाणे मालेगावातील मोसम नदीसाठीही विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची यंत्रणांच्या मदतीने स्वच्छता करण्यात यावी. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो.
— मयूर वांद्रे, प्रदेश सचिव, काँग्रेस ओबीसी विभाग
"महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोसम नदीची दुर्दशा झाली आहे. शहरात जलप्रदूषण आणि वायूप्रदूषण वाढत असून नदी स्वच्छतेसाठी प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे."
— रामदास बोरसे, सामाजिक कार्यकर्ते,
सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव