टुडे पान १
----
मालेगावसह कसमादेसाठी
१० जुलैला चणकापूरचे आवर्तन
--
पाणीटंचाईचे संकट: अनेक योजनांमध्ये जेमतेम दहा दिवस पुरेल इतकाच जलसाठा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २६ : मालेगाव शहरासह कसमादे भागातील विविध पाणीपुरवठा योजनांवर पाण्याचा ताण वाढला असून, अनेक योजनांमध्ये जेमतेम दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे तिसरे व यंदाचे शेवटचे आवर्तन १० जुलैला सोडले जाण्याची शक्यता आहे.
---
गेल्या वर्षी समाधानकारक पावसामुळे बहुतांश धरणांमधून पहिले आवर्तन फेब्रुवारीत सोडण्यात आले. मात्र, यंदा मालेगावसह कसमादे परिसरातील धरणांमध्ये सरासरी केवळ २० टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ३८ टक्के होता. सध्या चणकापूर धरणात ७५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. आवर्तनासाठी सुमारे ३५० ते ४०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर होण्याची शक्यता असून ते साधारण आठवडाभर सुरू राहील. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गिरणा नदीचे पात्र ओले असल्याने आवर्तन सोडणे सुलभ होणार आहे.
चणकापूर धरणातून गिरणा नदी व डाव्या कालव्याद्वारे महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात पाणी पोहोचते. तळवाडे तलावात सध्या ३४ दशलक्ष घनफूट पाणी असून ते आणखी सुमारे २० दिवस पुरेल. चणकापूरच्या आवर्तनाचा लाभ मालेगावसह कसमादेतील ५२ लहान-मोठ्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. हरणबारी धरणात ४०२ दशलक्ष घनफूट जलसाठा असून तेथूनही लवकरच आवर्तन सोडले जाणार आहे. त्याचा लाभ मोसम खोऱ्यातील गावांना मिळेल.
केळझर धरणात २५८, पुनंदमध्ये ६२, नागासाक्यात १५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून माणिकपुंज धरण कोरडे पडले आहे. मालेगाव शहरासह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात सध्या ४ हजार ५६९ दशलक्ष घनफूट जलसाठा उपलब्ध आहे.
-----
चौकट
कसमादेतील धरणसाठा (दशलक्ष घनफूटात)
---
धरणाचे नाव - साठवण क्षमता - आजचा पाणीसाठा - टक्केवारी
चणकापूर - २४२७ - ७५० - ३०.९०
हरणबारी - ११६६ - ४०२ - ३४.४८
केळझर - ५७२ - २५८ - ४५.१०
नागासाक्या - ३९७ - १५ - ३.७८
गिरणा - १८५०० - ४५६९ - २४.७०
पुनद - १३०६ - ६२ - ४.७६
माणिकपुंज - ३३४ - ०० - ००
---