मालेगाव परिसरात तिघांची
गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २६ : मालेगाव शहर व तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघा तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
पहिली घटना शहरातील सनाउल्ला भागात घडली. येथील अश्पाक अहमद अनिस अहमद (वय ४६) यांनी गुरुवारी (ता. २५) पाचच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. त्यांचे भाऊ अल्ताफ अहमद यांनी त्यांना तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घाेषित केले. याप्रकरणी आझादनगर पोलिसात नोंद झाली आहे.
दुसरी घटना कॅम्प भागातील सानेगुरुजी नगरमध्ये घडली. अनिकेत बाळासाहेब जगताप (वय २७) या तरुणाने गुरुवारी रात्री राहत्या घरात लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. नातेवाईकांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अंकिता पवार यांनी मयत घोषित केले. कॅम्प पोलिसात याची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना तालुक्यातील करंजगव्हाण येथे घडली. शरद महारू बच्छाव (वय ३२) या तरुणाने बुधवारी राहत्या घरी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. समाधान कचवे यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचार सुरू असताना गुरुवारी प्रकृती बिघडल्याने सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉ. रोहित यांनी त्याला मयत घोषित केले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
---