‘अमृत’ मार्फत विश्वबंधुत्व
अभियानांतर्गत विश्वबंधुत्वाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १७ : युवकांमध्ये मानवता, बंधुभाव, सामाजिक एकात्मता आणि सौहार्दाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने ‘अमृत विश्वबंधुत्व दिन – विश्वबंधुत्व पंधरवडा’ अभियानांतर्गत येथील कॅम्पातील के. बी. एच. एस. एस. ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कार्यक्रम झाला. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश देण्यात आला, अशी माहिती अमृत चे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता यांनी पत्रकान्वये दिली आहे. ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या विश्व धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मृतीनिमित्त २०२६ पासून ‘अमृत विश्वबंधुत्व दिवस’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. समाजात विश्वबंधुत्व, मानवता, सहिष्णुता, सामाजिक सलोखा आणि सौहार्दाची भावना दृढ करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
निवृत्त प्राचार्य प्रा. संजय पाठक यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. युवकांनी जात, धर्म, भाषा व प्रांताच्या सीमा ओलांडून परस्पर प्रेम, आपुलकी आणि सहकार्याची भावना जोपासावी. सामाजिक सलोखा व मानवतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठी युवकांनी सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.श्री. गुप्ता यांनी प्रास्ताविकातून विश्वबंधुत्व पंधरवड्याचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमास फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.