मनमाडचा वीजपुरवठा सुरळीत करा
शिवसेनेचा महावितरणला महिन्याचा अल्टिमेटम
सकाळ वृत्तसेवा
मनमाड, ता. २५ : शहरातील वारंवार होणाऱ्या वीजखंडितीचा प्रश्न तातडीने सोडवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शिवसेनेने महावितरणकडे केली असून त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या वीजखंडितीमुळे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. यावेळी नवनियुक्त कार्यकारी अभियंता प्रजापती, अतिरिक्त कार्यकारी अभियंता करेरा, उपकार्यकारी अभियंता नलावडे, शहर अभियंता कुमावत, सहाय्यक अभियंता दत्तात्रेय सांगळे उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून समस्या सोडविण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. त्यानुसार शिवसेनेने एक महिन्याची मुदत दिली.
निवेदनात २४ तास तक्रार निवारण केंद्र सुरू करणे, स्वतंत्र मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देणे, देखभाल कामांची पूर्वसूचना देणे, विविध फिडर्सवरील वीजखंडितीचा तपशील जाहीर करणे, मुख्य बाजारपेठ, रुग्णालये व शाळांचा परिसर पाकीजा वाहिनीला जोडणे, घरगुती ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती न करणे, स्मार्ट मीटरमधील बिलांच्या त्रुटी दूर करणे, नवीन उपकेंद्राचे काम सुरू करणे तसेच वागदर्डी फिडर व ३३ केव्ही वाहिणीबाबतच्या तांत्रिक मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला. शहरप्रमुख मयूर बोरसे, नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपप्रमुख सुनिल हांडगे, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, जिल्हा संघटक नाना शिंदे, नगरसेवक अमजद पठाण, दिनेश घुगे, रत्नदीप पगारे, लोकेश साबळे, युवासेना शहराधिकारी आसिफ शेख यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मनमाड : वीज कार्यालयात बैठकीला उपस्थित अभियंते, शिवसेना पदाधिकारी.