(पान ४ ला मेन)
MSI26B09584
राजबाईशेवाळी (ता. साक्री) : शिवारात पावसाअभावी करपून गेलेले खरिपातील बाजरी पीक.
-----------------
पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
शेतकऱ्यांना दमदार पर्जन्यवृष्टीचा प्रतीक्षा; पिके धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १६ : पावसाळ्यात अतिशय महत्त्वपूर्ण समजले जाणारे उत्तरा नक्षत्रास रविवारपासून (ता. १३) आरंभ झाला असून, अजूनही दमदार पाऊस न झाल्याने खरिप हंगाम संकटात आहे. पश्चिम पट्टा वगळता बाकी तालुक्यात अन्य भागात कोरडवाहू पिके शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. उंच, चौफेर वनक्षेत्र असलेल्या राजबाई शेवाळीत मात्र पावसाअभावी केवळ चारा गोळा करण्याची वेळ येणार आहे.
------
आजपासूनच दुष्काळाचे सावट गडद होत चालल्याने कोरडवाहू शेतकरी चिंतेत आहेत. संपूर्ण पावसाळा उलटला तरी तालुक्यातील काही भागात केवळ भिज पावसात तग धरून आहेत. भडगाव, राजबाई शेवाळी भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरिपातील तृणधान्यातील मका, बाजरी, ज्वारी, कडधान्ये, सूर्यफूल, कापूस ही पिके अक्षरशः होरपळून निघत असल्याने दुष्काळी पट्ट्यातील बळीराजा हतबल झाला आहे.
-----------
दुष्काळसदृश्य परिस्थिती
दरम्यान, निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असलेल्या राजबाईशेवाळीत भविष्यात चारा, पाणीटंचाईची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे दुष्काळसदृश्य भागात शासनाकडून शेतीच्या पाण्यासाठी अद्याप कोणतीही शाश्वत योजना राबवली गेलेली नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पूर्णपणे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागते. खरीप हंगामासाठी ओळखल्या जाणाऱ्या साक्री तालुक्यात एकापाठोपाठ एक सर्वच पावसाची नक्षत्रे कोरडी गेली आहेत.
---------
कोरडवाहू पिकांचा असतो बोलबाला
साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी कोरडवाहू पिकांचा बोलबाला असतो. यंदा हवामान खात्याने पावसाचे प्रमाण नगण्य असल्याचा अंदाज वर्तविला होता आणि तो आज खरा ही ठरत आहे. कृषी विभागाने जाहीर केल्या प्रमाणे कमी पाण्यात लवकर तयार होणाऱ्या पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी प्राधान्याने केली आहे. दुसरीकडे पेरणी नंतर पावसाने मोठी ओढ दिली आहे. अंतरमशागत, निदंणी, विरळणीनंतर पावसाने पाठ फिरवली. शेतकरी आणि शेतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलांच्या बैल- पोळ्याला हमखास पाऊस येईल ही आशाही फोल ठरली आहे. पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार ठरू शकतो. पण, विहिरींनी तळ गाठला आहे. विहिरी, कूपनलिकांच्या उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली खरी; मात्र आता भूजल पातळी खालावल्याने पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यातच भाद्रपद महिन्याच्या कडक उन्हामुळे उभी पिके डोळ्यांदेखत जळून खाक होत आहेत. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असलेल्या अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर यांचा प्राधान्याने विचार करत शासकीय मदतीची तजविज करावी, अशी मागणी अरुण शिंदे, उपसरपंच भटू शिंदे, निलेश शिंदे, दगा रतन शिंदे, आप्पा शिंदे, अशोक शिंदे, माधवराव शिंदे, पप्पू शिंदे, भास्कर शिंदे यांनी केली आहे.
--------------
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासकीय यंत्रणेने स्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. विहीरींनी तळ गाठल्याने रब्बी हंगामाविषयी साशंकता आहेच. या पार्श्वभूमीवर उपाय योजना राबविण्यात याव्यात.
- अरुण माधवराव शिंदे, माजी सरपंच, राजबाईशेवाळी