नांदगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करावा
आमदार सुहास कांदे यांची मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांकडे मागणी
नांदगाव, ता. १६ : पावसाने पाठ फिरवल्याने नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव व मालेगाव तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. पिण्याच्या पाण्यापासून चारा-पाण्यापर्यंत, खरिपापासून आगामी रब्बी हंगामापर्यंत सर्वच आघाड्यांवर संकट निर्माण झाल्याने मतदारसंघ तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे.
मतदारसंघातील सर्वच गावांत पाणीटंचाई असून, विहिरी, बोअरवेल आणि तलाव कोरडे पडले आहेत. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होत असतानाच चारा, पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी तातडीने चारा छावण्या, चारा डेपो सुरू करावा, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी तातडीने जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त गावांत टँकर मंजूर करावेत, जुन्या योजनांची दुरुस्ती करावी, दुष्काळी भागाची कागदोपत्री पाहणीऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन तातडीने मदतकार्य सुरू करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
.........
कोट
मुबंईत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेत मतदारसंघातील यंदाच्या दुष्काळाचे सावट व त्यावर उपाययोजना यावर विचारविनिमय केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आमदार सुहास कांदे, नांदगाव