अँकर
--
फोटो ः 08461
---
पंचवीस वर्षांपासूनचा रस्ता वाद मिटला
मरळगोई बुद्रुकला कोर्ट लढाईऐवजी सामंजस्याने सोडवला प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता. २४ : तालुक्यातील मरळगोई बुद्रुक येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वहिवाट रस्त्याच्या वादावर अखेर तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आहे. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या पुढाकारामुळे वादी व प्रतिवादी यांच्यात सामंजस्य निर्माण होऊन वाद कायमचा मिटल्याने गावात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
--
वादी दामोदर त्र्यंबक जगताप यांनी रस्त्याबाबत दावा दाखल केला होता. या प्रकरणात मनुबाई रामकृष्ण जगताप, मथुराबाई रामसाहेब गडाख, पुष्पाबाई मच्छिंद्र जाधव, माणिक त्र्यंबक जगताप, सुमनबाई दामोदर जगताप, महेश पोपट जगताप व भागीरथीबाई पोपट जगताप हे प्रतिवादी होते. या प्रकरणाच्या अनुषंगाने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी कमलेश पाटील, कोतवाल किशोर गाडे, ज्येष्ठ नागरिक व मध्यस्थ निवृत्ती जगताप आणि पंडित मुदगुल उपस्थित होते. स्थळ निरीक्षणादरम्यान दोन्ही बाजूंची मते ऐकून घेण्यात आली.
तहसीलदार नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. त्यातून सर्व संबंधितांनी परस्पर सहमतीने आपापल्या गटातून जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
--
सहकार्याची भावना जपण्याचे आवाहन
न्यायालयीन लढाईऐवजी संवाद आणि सामंजस्याच्या माध्यमातून २५ वर्षांचा जुना प्रश्न निकाली निघाल्याने वादी व प्रतिवादींनी समाधान व्यक्त केले. तहसीलदार नाईकवाडे यांनी यावेळी गावात शांतता, सलोखा आणि परस्पर सहकार्याची भावना जपण्याचे आवाहन केले.
---