डिजिटल अरेस्टचा बनाव करून ४२ लाखांना गंडा
मुंबई पोलिस, मनी लाँड्रिंगची भीती दाखवून उकळली रक्कम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता ३१ : सायबर गुन्हेगारांनी आता ज्येष्ठ नागरिकांना निशाणा बनवण्यास सुरुवात केली असून, मुंबई पोलिस असल्याचे भासवून नाशिकमधील एका ७३ वर्षीय ज्येष्ठाला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ४२ लाख ६० हजार ४३४ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम राठोड (वय ७३, रा. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, ते २२ ऑगस्टला घरी असताना अज्ञात व्हॉट्सॲपवरून व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपण मुंबई पोलिस आणि क्राईम ब्राँचमधून बोलत असल्याचे सांगत भीती घालण्यास सुरुवात केली. भामट्याने राठोड यांच्या नावाचे एसबीआय एटीएम कार्ड मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना मदत करण्याच्या प्रकरणात वापरले गेल्याचा खोटा दावा केला. तसेच त्यांच्याविरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अरेस्ट वॉरंट जारी झाल्याचे सांगितले. तसेच, ‘तुमचे ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. हे नॅशनल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत असल्याने याबाबत कोणालाही काही सांगू नका, अन्यथा अटक होईल,’ अशी धमकी देत वृद्धाला २४ तास व्हिडिओ कॉलवर राहण्यास भाग पाडले.
तपासाच्या नावाखाली भामट्यांनी राठोड यांच्याकडून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या सर्व बँक खात्यांची, एफडी व बचत खात्याची माहिती काढून घेतली. भामट्यांनी ते या प्रकरणात सहभाग नाही हे तपासण्यासाठी पैसे सरकारकडे जमा करावे लागतील, तपास पूर्ण झाल्यावर २ ते ३ तासांत पैसे परत मिळतील, असे सांगत एफडी मोडून आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगितले. भीतीपोटी ज्येष्ठाने २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान स्वतःच्या आणि पत्नी मीरा राठोड यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमधून अनुक्रमे २९ लाख १० हजार २१७ रुपये आणि १३ लाख ५० हजार २१७ रुपये असे एकूण ४२ लाख ६० हजार ४३४ रुपये भामट्यांनी दिलेल्या कोटक महिंद्रा बँक व आयसीआयसीआय बँकेच्या खात्यांवर ट्रान्स्फर केले.
--चौकट
बनावट पावत्या
पैसे पाठवल्यानंतर भामट्यांनी व्हॉट्सॲपवर ‘भारत सरकार’, ‘वित्त मंत्रालय’ आणि ‘पंतप्रधान कार्यालय’ यांच्या नावाने बनावट पोचपावत्याही पाठवल्या. मात्र, दिलेली मुदत उलटूनही पैसे परत न आल्याने आणि भामट्यांनी फोन उचलणे बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे राठोड यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने शहर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे या अधिक तपास करत आहेत