पान दोन ॲंकर
--------------
०२९७७
नाशिक : म्हसरुळ-मखमलाबाद लिंकरोडवरील कणसरामाता चौकात झालेली वाहतुकीची कोंडी
कणसरामाता चौकातील वाहतूक कोंडी बनली नित्याची
कर्णकर्कश हॉर्न, अवजड वाहनांमुळे स्थानिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोडवर कणसरामाता चौकात दररोज सायंकाळ होणारी वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा, कर्णकर्कश हॉर्नचा आवाज, वाहनधारकांमध्ये होणारी वादावादी आणि नागरी वस्तीतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे येथील स्थानिक रहिवासी पुरते त्रस्त झाले आहेत.
म्हसरूळ-मखमलाबाद लिंक रोड हा गुजरात आणि मुंबई-आग्रा महामार्गाला जोडणारा जवळचा रस्ता आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिल्याने लोकसंख्या वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या रस्त्यावरील कणसरामाता चौकात सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यातच २४ तास सुरू असणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे स्थानिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
चौकट
भाजीबाजार ठरतोय अडथळा
सध्या शहरातील इतर रस्त्यांप्रमाणेच या रस्त्याचेही काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे म्हसरूळ गाव ते कणसरामाता चौकापर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच भर म्हणून, सायंकाळी या मुख्य रस्त्यालगतच मोठा भाजीबाजार भरतो. खरेदी करणाऱ्यांची वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी असतात. या बाजारावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नसल्याने विक्रेत्यांची अरेरावी वाढली आहे. दररोज सायंकाळी ६ ते रात्री ८ या तब्बल दोन तासांच्या काळात येथे प्रचंड वाहतूक कोंडी होेते.
वाहतूक कोंडीची मुख्य कारणे:
रस्त्यालगत भरणारा भाजीबाजार
अवजड वाहनांची वर्दळ
सिग्नल यंत्रणेचा अभाव
वाहतूक पोलिस उपलब्ध नसणे.
खड्ड्यांचे साम्राज्य
चौकातील वाहतूक कोंडी आता रोजचीच झाली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यावर दुभाजक टाकून येथे वाहतूक सिग्नल कार्यान्वित केल्यास ही कोंडी टाळता येऊ शकेल.
प्रमोद घुगे, स्थानिक रहिवासी.