फोटो - बी०३११०
-----------------
मतदारयादीतील वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करा
काँग्रेसची एसआयआर मोहिम; बीएलओ व पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जनजागृती करण्याचे संदीप पाटील यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : प्रारूप मतदारयादीतून वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी काँग्रेसने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे आवाहन पक्षाचे जिल्हा प्रभारी ॲड. संदीप पाटील यांनी केले. काँग्रेस भवन येथे झालेल्या जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
दावे-हरकती दाखल करून नावे समाविष्ट करण्यासाठी केवळ दहा-बारा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याचे पाटील यांनी सांगितले. या कालावधीत नव्या मतदारांसह प्रारूप मतदारयादीतून चुकीने वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक शहरातील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रारूप मतदारयादीतून सरासरी एक ते दोन लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. या पार्श्वभूमीवर एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदारांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बीएलओ एक व दोन, ब्लॉक अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांनी समन्वयाने ही मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश (बबलू) खैरे यांनी प्रास्ताविक केले. उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे आणि दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विविध ब्लॉकचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, चांदवड तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोके, शहराध्यक्ष ॲड. अन्वर पठाण आणि तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गटाचे माजी शहरप्रमुख मुकेश कोतवाल यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी तसेच संयुक्ता बनकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी ॲड. पाटील यांच्या उपस्थितीत आणि भारत टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला.