महापालिका आयुक्तांचा आरोप खोटा
दशरथ पाटील आक्रमक; आयुक्तांना आठ दिवसांचा अल्टिमेटम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : पंचवटीतील पब्लिक ॲमिनिटी आरक्षणात बदल करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावाला आपण केवळ हरकत नोंदविली होती. मंदिर पाडण्याची कोणतीही मागणी केली नव्हती, असा खुलासा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला. आयुक्त मनीषा खत्री यांनी बैठकीत मंदिर तोडण्याची मागणी केल्याचा आपल्यावर खोटा आरोप केला असून, हे प्रशासकीय संकेतांचे उल्लंघन असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. आयुक्तांच्या कार्यपद्धतीत आठवडाभरात सुधारणा न झाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची मागणी करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
पंचवटी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या सिंहस्थ धर्मध्वजारोहणाच्या नियोजन बैठकीत पाटील आणि आयुक्त खत्री यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजित कामांना होत असलेल्या विलंबावरून पाटील यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना आयुक्तांनी पाटील यांनी मंदिर हटविण्यासाठी पत्र दिल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
पाटील म्हणाले, की पंचवटीतील सर्व्हे क्रमांक २९४ आणि २९५ मधील सार्वजनिक सुविधेसाठी आरक्षित जागेचा निवासी क्षेत्रात समावेश करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. या प्रक्रियेला आपण ११ एप्रिल २०२५ ला पत्र देऊन आक्षेप नोंदविला होता. मात्र, त्या पत्रात मंदिराबाबत कोणताही उल्लेख नव्हता. असे असतानाही आयुक्तांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करून आपल्यावर आरोप केला.