टुडे मेन साठी
------------
गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग बदलाच्या हालचाली
सिंहस्थ कामांमुळे पंचवटी कारंजापुढे मिरवणूक नेणे अशक्य
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : रामतीर्थ परिसरात रामकाल पथासह सिंहस्थाची विविध कामे सुरू असल्याने यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पंचवटी कारंजापुढून पुढे नेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गात बदल करून तो जुन्या आडगाव नाका आणि गणेशवाडीमार्गे गौरी पटांगणापर्यंत आणण्याचा पर्याय पुढे आला असून महापौर हिमगौरी आडके, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्त पाहणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिका मुख्यालयातील राजीव गांधी भवन येथे स्थायी समिती सभागृहात मंगळवारी महापौर आडके यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील प्रश्नांवर आढावा बैठक झाली. उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री या बैठकीस प्रमुखत्वे उपस्थित होते. मिरवणूक मार्ग अतिक्रमणमुक्त आणि खड्डेमुक्त करण्याच्या सूचना या वेळी प्रशासनाला देण्यात आल्या. रामतीर्थ परिसरातील कामांमुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण होऊन गणेश मंडळांची गैरसोय होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची पाहणी करण्याचे महापौरांनी सांगितले. एनएमसी ई-कनेक्ट ॲपवरील प्रलंबित तक्रारींचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यापर्यंत आठ हजारांहून अधिक तक्रारी प्रलंबित होत्या, त्यापैकी गेल्या तीन-चार दिवसांत अडीच हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून सध्या ५ हजार ६९८ तक्रारी शिल्लक आहेत. यामध्ये बांधकाम विभागाशी संबंधित खड्डे आणि पावसाळी गटारींच्या सर्वाधिक २ हजार ६२६ तक्रारी असून त्यापाठोपाठ नगररचना विभागाच्या तक्रारी आहेत. या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे आदेश महापौरांनी दिले.
---चौकट
विश्वासात घेतले जात नसल्याची खंत
सिंहस्थासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असल्याने त्यातून होणारी कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत आणि शहराची प्रतिमा जपली जावी, अशी अपेक्षा उपमहापौर विलास शिंदे यांनी व्यक्त करत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर प्रशासकीय राजवटीत कामे झाली असती तर खड्ड्यांचा प्रश्न उद्भवला नसता, अशी नाराजी व्यक्त करीत स्थायी सभापती मच्छिंद्र सानप यांनी आपल्या प्रभागात सिंहस्थाचे काम सुरू असूनही विश्वासात घेतले जात नसल्याची खंत बोलून दाखवत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
--चौकट
अधिकारी दिवसभर फिल्डवर असल्याचे सांगून मुख्यालयात अनुपस्थित राहत असल्याने लोकप्रतिनिधींना प्रश्न मांडता येत नाहीत, तर काही अधिकारी बैठकांत व्यस्त राहिल्याने फिल्डवरील कामांच्या दर्जावर परिणाम होतो, या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाली. यावर तोडगा म्हणून अधिकाऱ्यांनी दुपारी चार ते सहा या वेळेत मुख्यालयात उपस्थित राहावे आणि उर्वरित वेळेत फिल्डवरील कामांवर लक्ष द्यावे, ही उपमहापौर शिंदे यांनी मांडलेली सूचना महापौर आणि आयुक्तांनी मान्य केली.