फोटो : H29742
नाशिक : ई- बसमधून प्रवास करताना नाशिककर.
ई-बस प्रवासी सेवेला प्रत्यक्ष सुरुवात
पहिल्याच दिवशी ५२६ प्रवाशांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : केंद्र सरकारच्या पीएम ई- बस सेवा योजनेच्या माध्यमातून नाशिक महानगर परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या विद्युत बसगाड्या मंगळवारी (ता. १५) प्रत्यक्ष प्रवासी सेवेत दाखल झाल्या. सुरुवातीच्या टप्प्यात दोन ई-बस मार्ग क्रमांक १०२ आणि १०३ वर धावू लागल्या असून, पहिल्याच दिवशी या पर्यावरणस्नेही सेवेने नाशिककरांचे लक्ष वेधले.
सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे आणि उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) संजय सुर्वे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ई-बसगाड्या प्रवासी सेवेसाठी मार्गस्थ करण्यात आल्या. यापूर्वी २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ई-बसगाड्यांचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर आजपासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात झाली आहे.
मार्ग क्रमांक १०२ वर तपोवन टर्मिनस ते बारदान फाटा, जुना आडगाव नाका, रविवार कारंजा, सीबीएस, राजीव गांधी भवन, एचपीटी कॉलेज, महात्मानगर, आयटीआय, सातपूर मनपा विभागीय कार्यालय, सातपूर कॉलनीमार्गे अशोकनगर असा मार्ग असणार आहे. तर मार्ग क्रमांक १०३ वर तपोवन टर्मिनस ते सिम्बायोसिस कॉलेज, जुना आडगाव नाका, सीबीएस, वेद मंदिर, पवननगर या मार्गावर ई-बस धावणार आहे. उर्वरित ई- बस टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या मार्गांवर सेवेत आणल्या जाणार असल्याची माहिती सिटीलिंक प्रशासनाने दिली. राजलक्ष्मी सुर्वे आणि उज्ज्वल सुर्वे हे सिटीलिंकच्या ई-बस सेवेचे पहिले प्रवासी ठरण्याचा मान मिळवला. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या कालावधीत दोन ई-बसच्या ये-जा मिळून एकूण चार फेऱ्या पूर्ण झाल्या. या चार फेऱ्यांमधून तब्बल ५२६ प्रवाशांनी ई-बस सेवेचा लाभ घेतला. कमी आवाज, आरामदायी प्रवास आणि पर्यावरणपूरक सेवा याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. विशेष म्हणजे, ई-बस सेवेसाठी कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ लागू करण्यात आलेली नाही. सध्याच्या बस भाडेदरानुसारच प्रवाशांकडून शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी ई-बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. या ई-बसगाड्यांमुळे शहरातील वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि शाश्वत करण्याच्या दिशेने सिटीलिंकने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
-------