टुडे साठी
---------
सिग्नल एकाच केंद्रीय प्रणालीशी जोडा
पोलिस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि विविध प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्व वाहतूक सिग्नल एकाच केंद्रीय नियंत्रण प्रणालीशी जोडण्याची मागणी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक सिग्नल नियंत्रण व्यवस्था अधिक आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सध्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अखत्यारित सुमारे ४० वाहतूक सिग्नल, तर महापालिकेच्या अखत्यारित २० सिग्नल कार्यरत आहेत. दोन्ही यंत्रणांच्या सिग्नलसाठी स्वतंत्र केंद्रीय नियंत्रण व प्रवेश व्यवस्था असल्याने वाहतूक पोलिसांना एकाच ठिकाणाहून संपूर्ण शहरातील सिग्नलचे नियंत्रण करता येत नसल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणले आहे. वाहतूक कोंडीच्या परिस्थितीनुसार सिग्नलचा कालावधी व हिरवा सिग्नल तत्काळ बदलणे, विविध मार्गांवरील सिग्नलमध्ये समन्वय साधणे, वाहतुकीचे थेट निरीक्षण करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल व पोलिस वाहनांना जलद मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सध्याची व्यवस्था अडथळा ठरत असल्याचे पत्रात म्हटले आहे. सिग्नलमधील तांत्रिक बिघाड, बंद सिग्नल तसेच सिग्नलच्या कालावधीचे एकत्रित निरीक्षण करून तातडीने उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणांशी समन्वय साधावा लागतो. यामुळे वाहतूक नियंत्रणाची कार्यक्षमता प्रभावित होत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
--चौकट
थेट पोलिसांकडे सोपवण्याची गरज
स्मार्टसिटीअंतर्गत कार्यरत सिग्नल आणि महापालिकेच्या अखत्यारितील सिग्नल एकाच केंद्रीय नियंत्रण व निरीक्षण प्रणालीशी जोडून त्याचे एकत्रीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या एकात्मिक प्रणालीद्वारे वाहतूक पोलिसांना अधिकृत नियंत्रण व प्रवेश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची सूचनाही पोलिस आयुक्त कार्यालयाने केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण अधिक गतिमान, समन्वित आणि तंत्रज्ञानाधारित होण्यास मदत होईल.