‘एमपीएससी’चा आता थेट निकाल
‘ऑप्टेड आउट’चा पर्याय रद्द, बहुसंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादी नाही
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे बदल केले आहेत. मध्यंतरी उमेदवारांना उपलब्ध करून दिलेला ऑप्टेड आउट अर्थात भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय रद्द केला. त्यामुळे आता गुणवत्ता यादीवर आधारित थेट निकाल जाहीर केला जाणार आहे.
आयोगाच्या बुधवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, तो तत्काळ प्रभावाने लागू केला आहे. आयोगाने उमेदवारांना यापूर्वी ऑप्टेड आउट हा पर्याय उपलब्ध करून दिला होता. या अंतर्गत कुठल्याही भरती परीक्षेच्या निकालावर आधारित तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याची संधी उपलब्ध केली होती. आता आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी हा पर्याय आणि ‘संमती विकल्प’ देण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता एकल संवर्गाच्या भरतीसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील. मात्र, बहुसंवर्गीय पदांच्या भरतीसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी राहणार नाही. बहुसंवर्गीय पदभरतीत जर एखादा उमेदवार आधीच एखाद्या पदावर नियुक्त झाला असेल, तर त्याने पुन्हा त्याच पदाचा किंवा त्यापेक्षा खालच्या (निम्न) पदाचा पसंतीक्रम दिला, तरीही शिफारशीसाठी त्याचा विचार केला जाणार नाही.
इन्फोः
यासाठी घेतला निर्णय...
भरती प्रक्रियेत सुधारणा करणे आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. निर्णय पारित झाल्याने आतापासून पुढील सर्व भरती प्रक्रिया याच नवीन नियमांनुसार पार पडतील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले.