बदललेल्या व्यवस्थेमुळे चौकोनी कुटुंब एकाकी!
दीपिका वाघ, नाशिक
भारतीय कुटुंब पध्दतीचा प्रवास एकत्र कुटुंब पद्धतीपासून ते हम दो हमारे दो, एकच मूल सुंदर फूल, डिंक (डबल इन्कम, नो किडस) ते ‘आता लग्नच नको’ पर्यंतच्या कम्युनिटीपर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या दहा वर्षापासून कुटुंब पद्धतीत झालेल्या बदलाचा गांभीर्याने विचार न केल्यास भविष्यात कुटुंब व्यवस्था पूर्णपणे मोडकळीस येऊन घरात सदस्यच उरणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. समाजातील बदललेल्या व्यवस्थेमुळे चौकोनी कुटुंबांवर एकाकी जगण्याची वेळ आली आहे.
शिक्षण, करिअरला प्राधान्य देत, उशिराने होणारी लग्न त्यातून नोकरीनिमित्त बाहेर राहणाऱ्या जोडप्यांना जिथे एकमेकांना द्यायला वेळ नसतो, तिथे जन्माला येणाऱ्या मुलाला सांभाळणार कोण, यासारखा गहन प्रश्न पडतो. मुलगी एकुलती असेल तर तिच्यावर घराबरोबर आई वडिलांची जबाबदारी पार पाडण्याची वेळ येते. त्यामुळे आज मुल नको या निर्णयाबद्दल दांपत्यांची वेगवेगळी ठोस विचारधारा आढळून येते. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते सांगतात की, सध्या समाजात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना शिक्षण, नोकरीत असणारी जीवघेणी स्पर्धा, वाढत्या आरोग्याच्या समस्या, आर्थिक अस्थैर्य, नात्यांमधील एकाकीपणा, उतारवयात आई वडिलांची हेळसांड होऊ नये यासारखे अनेक घटक मूल नको’ असा निर्णय घेण्यासाठी पुरेसे ठरतात. नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे लग्नाला दहा वर्ष उलटून मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे कोणताही पश्चात्ताप होत नाही. उलट आजची समाजातील परिस्थिती पाहता घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे कानडे दांपत्य सांगतात. वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर सर्व गोष्टी कमावल्यानंतर त्याचा उपभोग घ्यायला मात्र ‘जवळची’ माणसे नसल्याची खंत नाकारून चालत नाही. त्यामुळे सध्या समाजात दोन्ही विचारधारा बाळगणारे दांपत्य आढळून येत आहेत.
इन्फो...
उबग आलाय नात्यांचा
सधन चौकोनी कुटुंबातील आई वडील मुलीला समुपदेशनासाठी घेऊन आल्यावर नात्यातील गुंता उलगडत गेला. नीट परीक्षेची तयार करणारी मुलगी, जिला कोणत्याही वस्तूची कमतरता नव्हती परंतू, सलग दोन वर्षापासून नीट परीक्षेची तयारी करीत असल्यामुळे घरात नेहमी एकाच विषयावर चर्चा हाेत असे व वडीलही घरी आल्यानंतर मुलीला आज किती प्रश्न सोडविले अशी चौकशी करायचे. त्यामुळे मुलीला नात्यांचा उबग आल्याने तिने अभ्यास करणेच सोडून दिले. समुपदेशनावेळी बाब निदर्शनास आल्यावर अडचण लक्षात आली.
कोट...
मुल जेव्हा त्यांच्या आई वडिलांचे वैवाहिक आयुष्य पाहतात तेव्हा ते चांगले असेल तर, अडचण येत नाही पण, आई वडील दाखविण्यापुरते एकत्र राहत असतील तर, त्याचा मुलांवर गंभीर परिणाम होतो. मुलांचा लग्न व परिणामी कुटुंबाविषयीची मते पक्की होत जातात.
- प्रा. डॉ. तन्मय जोशी, समुपदेशक
-------