खरीप हंगामासाठी आजपासून
कापूस बियाणे खरेदीसाठी खुले
(उपशीर्षक)
बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे नियोजन; १ जूननंतरच लागवडीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ ः आगामी खरीप हंगामात कपाशी लागवडीपूर्वी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यासाठी बी. टी. कापूस बियाण्यांच्या विक्री, पुरवठा आणि लागवडीबाबत वेळापत्रक निश्चित केले असून, शुक्रवार (ता. १५)पासून कृषी केंद्रांवरून कापूस बियाणे शेतकऱ्यांना खरेदी करता येणार आहेत.
अनेक भागांमध्ये कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. दर वर्षी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. मागील काही वर्षांत गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. ही सर्व परिस्थिती पाहून शासनाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नियोजन केले आहे.
८ मेच्या परिपत्रकानुसार शासनाने सर्व कृषी यंत्रणांना नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंत्रालयातून पुणे कृषी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात खरीप हंगाम २०२६ मध्ये शेंदरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १० मेपर्यंत वितरकांपर्यंत बियाणे पाकीट प्राप्त झाले. १० मेनंतर वितरक ते किरकोळ विक्रेते व १५ मेपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बियाणे खरेदी करता येणार आहे.
जून संपल्यावरच कापूस लागवडीचे आवाहन
मागील काही वर्षांत कापूस उत्पादकांचे बोंडअळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. वेळेपूर्वी कापूस लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीच्या जीवनचक्राला पोषक वातावरण मिळते. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. यामुळे यंदाच्या खरीप हंगामात मॉन्सूनपूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी १ जूननंतर कापूस लागवड करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.