पान चार सेकंड मेन
महावितरणचे स्केच वापरावे
---
शहरात अघोषित वीज कपातीचे संकट
उपकेंद्रांवर ३० टक्के वाढला भार; खंडित वीजपुरवठ्याने नागरिक हैराण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. पारा ४५ पार गेला आहे. त्यामुळे शहरात विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने शहरातील ‘महावितरण’च्या सर्व उपकेंद्रांवरील वीजभार वाढला असून, शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अघोषित वीज कपात (लोड रिलिफ) करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी (ता.११) रात्री नऊपासून तर रात्री तीनपर्यंत शहरातील काही भागात वीजपुरवठा दोन ते तीन तासांपेक्षा अधिक वेळ बंद करून यंत्रणा सुरळीत ठेवण्यात येत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील सर्वच भागात रात्री दहापासून विजेचा लपंडाव सुरू होत आहे. यात महाबळ, रायसोनीनगर, वाघनगर, जिजाऊनगर, कांचननगर, नवीपेठ, पोलन पेठ, शिवाजीनगर, निमखेडी, रिंगरोड, शाहूनगर, हुडको उपकेंद्रावरील पिंप्राळा कक्ष क्रमांक २ मधील हरिविठ्ठलनगर, श्याम नगर, जय हनुमान नगर, गणेश कॉलनी, पिंप्राळा परिसर आदी परिसरातील खंडित वीजपुरवठ्याचे सत्र रात्रीपर्यंत सुरू होते.
२५० केव्हीचा भार वाढला
जळगाव शहरात आठ ते नऊ उपकेंद्र असून, या उपकेंद्रांवरून रोहित्रांच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो. परंतु वाढत्या उष्णतेने घरांमध्ये २४ तास पंखे, कूलर तसेच एसी सुरू असल्याने ३० टक्के विजेचा भार वाढला आहे. उन्हाळ्यात साधारण उपकेंद्रांवर १७० केव्हीपर्यंत विजेचा भार सुरू असतो. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून २५० केव्हीचा वीजभार वाढला आहे.
या कारणामुळे समस्या
महावितरणसोबत नोव्हेंबर २०११ मध्ये क्रॉम्प्टन कंपनीने करार केल्यानंतर शहरात वीजपुरवठा देण्याचे काम तीन वर्ष या कंपनीने केले. तीन वर्षात शहरात वीजपुरवठा यंत्रणा या कंपनीने उभारली होती. नंतर ही कंपनी सोडून गेल्यानंतर महावितरणकडून नवीन यंत्रणाच उभी केली नाही. त्यात शहराचा वाढलेला परिसर, ग्राहक संख्या यामुळे महावितरणच्या सुरू असलेल्या उपकेंद्रावर प्रचंड लोड पडत आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होत आहे.
कर्मचारी फोन उचलेना
रात्री दहानंतर वीजखंडित होण्याचा खेळ सुरू झाल्यावर नागरिक फोन करून वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल, यासाठी महावितरणच्या कर्मचारी व अधिकारी यांना फोन करत आहे. परंतु रात्री अधिकारी व कर्मचारी फोन उचलत नाही, तर कधी लागत नाही व व्यस्त येत आहे. टोल फ्रीनंबरवरून देखील तक्रार लवकर घेतली जात नसल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.
चौकट
लोड रिलिफ म्हणजे काय
शहरातील विविध उपकेंद्रांवर एकाच वेळी वीजभार वाढल्याने संपूर्ण वीजपुरवठा यंत्रणा बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही भागातील पुरवठा काही वेळासाठी बंद करणे. त्यानंतर तेथील वीजपुरवठा सुरळीत करून दुसऱ्या भागाचा बंद करणे करून वाढलेला वीजभार नियंत्रित करण्यासाठी ‘लोड रिलिफ’ करावे लागते.
कोट
तापमान प्रचंड वाढ झाल्याने शहरातील सर्वच उपकेंद्रावर एकाच वेळी वीजभार वाढत आहे. त्यामुळे लोड रिलिफ करून काही भागातील वीजपुरवठा बंद करून शहराचा वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे.
- दत्तात्रेय साळी, कार्यकारी अभियंता, जळगाव विभाग, महावितरण.