स्वगणनेचा आज अंतिम दिवस
उद्यापासून दुसरा टप्पा; जिल्ह्यात ३८ हजार ७७ नागरिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : जिल्ह्यात स्वगणना उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३८ हजार ७७ नागरिकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. स्वनोंदणीचा शुक्रवारी (ता. १५) अंतिम दिवस असून, अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. तसेच, येत्या काळात जनगणनेसाठी घरोघरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
केंद्र सरकारतर्फे जनगणना-२०२७ सुरू आहे. जनगणना ही देशातील सर्वांत मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया असून, या आकडेवारीच्या आधारेच केंद्र व राज्य सरकारांना विविध विकास योजना तयार करताना पायाभूत सुविधांचे नियोजन करणे शक्य होईल. जनगणनेच्या पहिला टप्प्यात १५ मेपर्यंत स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३८ हजार ७७ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत स्वगणना पूर्ण केली.
दरम्यान, जनगणनेचा शनिवार (ता. १६)पासून दुसरा टप्पा सुरू होत आहे. हा टप्पा १४ जूनपर्यंत चालेल. या वेळी प्रगणक व पर्यवेक्षक प्रत्यक्ष घर गणनेसाठी येणार असून, त्यांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यात सात हजार ५५५ प्रगणक
स्वगणनेत नागरिकांना https://se.census.gov.in या लिंकवर जाऊन स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. स्वगणनेत सहभागी होऊ न शकलेल्या नागरिकांची घरोघरी भेटी देऊन माहिती गोळा करण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यात ३३ चार्ज अधिकारी असून, त्यांच्या अखत्यारीत एकूण सात हजार ५५५ प्रगणक, तसेच एक हजार २८८ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.