शहर टुडे पान चारसाठी
-----------------------------
NSK26H19252
जळगाव : महासभेत नगरसेवक अरविंद देशमुख हे काळे कपडे व डोक्याला फीत बांधून अटलांटा व भूसंपादन प्रकरणात प्रशासनाचा निषेध नोंदविताना.
----------------------
भूसंपादनाची फाईल गहाळ; महासभेत प्रशासन धारेवर
दोषींवर कारवाईची मागणी; महापालिका आयुक्तांवर अविश्वासाचा इशाराही
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शिवाजीनगर परिसरातील भूसंपादन प्रकरणाची मूळ फाईल गहाळ झाल्याने महापालिकेवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरून गुरुवारी (ता.१४) झालेल्या महासभेत प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली. फाईल गहाळ होऊनही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला.
महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत लढ्ढा यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. महापालिकेत महत्त्वाच्या फाईली गहाळ होतातच कशा? आणि त्याबाबत जबाबदारांवर गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा सवाल त्यांनी केला. भूसंपादन प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात १९८४ मध्ये महापालिकेने रामकृष्ण चौधरी यांची जमीन खरेदी करून मोबदला दिला होता. त्याच जागेवर शाळेची इमारत उभारून ती एका संस्थेला चालविण्यास देण्यात आली. मात्र, संबंधित जमीनमालकांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला असून, त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपये भूसंपादन प्रकरणांत अडकत असल्याची टीका केली. उपमहापौर मनोज चौधरी यांनीही गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या जागांची माहिती मागूनही ती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी ही प्रकरणे १९८४ ते १९९७ दरम्यानची असून, त्यावेळी भूसंपादन प्रक्रिया योग्य पद्धतीने न झाल्याने सध्यास्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शुचिता हाडा यांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करीत भविष्यातही अशीच स्थिती राहिल्यास आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी काळा शर्ट व डोक्याला फित बांधून निषेध नोंदविला.
अर्थ समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव
जळगाव शहरासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, विकास कामे व महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी करावयाच्या विविध उपाय योजना, प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व प्रभावीरीत्या पार पाडण्यासाठीच्या उपाययोजना, महापालिकेचा बजेट तयार करण्यासंदर्भात सुधारणा सुचविणे आदी कामांसाठी अर्थ समिती काम करेल असा अभ्यासपूर्ण भाषणातून डॉ. राधेश्याम चौधरी यांनी प्रस्ताव सभेत मांडला.