एन्कर
लोगो: वसंत व्याख्यानमाला
--
फोटो : H19261
शिवरायांचे चरित्र आपण आचरणात आणलेच नाही
संदीप तापकीर : वसंत व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : शिवरायांचे चरित्र आजही रोज नव्याने समजून घेण्याचा विषय आहे. पण त्यांचा खरा इतिहास संपूर्ण रूपात कधीच पुढे आलेला नाही. त्याबाबत जवळपास सर्वच पिढ्यांमध्ये वाद घडलेले आढळतात. याचे मूळ कारण म्हणजे महाराजांचे चरित्र आपण कधीच आपल्या आचरणात आणू शकलो नाही, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास व दुर्ग अभ्यासक, शिवव्याख्याते संदीप तापकीर यांनी येथे केले.
वसंत व्याख्यानमालेच्या १०३ व्या ज्ञानसत्रात १४ वे पुष्प गुंफताना स्व. पंडितराव खैरे स्मृती व्याख्यानात ‘शिवरायांशी नित्य आठवावे । नि जीवित तृणवत मानावे’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर योगेश खैरे होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि स्व. पंडितराव खैरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्ष प्रा. संगीता बाफणा यांनी परिचय करून दिला. सुदर्शन कुलथे यांनी स्वागत केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
तापकीर म्हणाले की, छत्रपतींना अभिप्रेत असलेले स्वराज्य, महाराष्ट्र आज कुठे दिसतो का? असा प्रश्न स्वाभाविकच पडतो. त्यातून महाराष्ट्राचे क्षेत्र अत्यंत संकुचित झाले आहे, असे वाटू लागते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या कर्तृत्वाचे दाखले नेहमीच दिले जातात. पण त्यांच्या केवळ आरमाराचा आपण अभ्यास केला असता तरी आपल्याला २६/११ च्या प्रसंगाला सामोरे जावे लागले नसते. अशा पार्श्वभूमीवर त्यांचं चरित्र आपण जगण्याची गरज आहे. दरम्यान, चित्र प्रदर्शनाच्या शृंखलेत नाशिकच्या कलानिकेतन महाविद्यालयातील वैभवी सुहास भगत, सोनाली दशरथ पाडवी, शेख अल्फिया चांद या विद्यार्थिनींच्या कलाकृती मांडण्यात आल्या. त्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
----
‘वारसा शौर्याचा’द्वारे अनुभवली शिवसृष्टी
व्याख्यानानंतर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित इंडोस्टेज क्रियेषण प्रॉडक्शन प्रस्तुत ‘शिव छत्रपती : वारसा शौर्याचा’ हा भव्य ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सादरीकरणाची संकल्पना व दिग्दर्शन प्रज्ञा सागडे यांनी केले, तर नृत्य दिग्दर्शन प्रियांका शिंदे यांचे होते. संगीत संयोजन दीपक वाळके यांनी, तर ध्वनी व्यवस्था महेश आंबेकर यांनी सांभाळली.
---चौकट
आजचे (दि. १५) व्याख्यान
१) वक्ते : डॉ.नितीन वाघमोडे
(आयकर आयुक्त, पुणे)
विषय : पाणी संकट : आजची वस्तुस्थिती आणि उद्याची जबाबदारी, लोकसहभागातून जलक्रांती
२) इंडोस्टेज क्रियेषण प्रोडक्शन प्रस्तुत ‘सितार सिंफनी’
(सादरकर्ते: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतार वादक रवि चारी)
३) चित्रप्रदर्शन : शौनक देव