NSK26H19268
जळगाव : वारंवार वीज खंडित होत असल्याने येणाऱ्या अडचणींबाबत महावितरणच्या चिंचोली उपकेंद्राच्या अधिकाऱ्यास निवेदन देताना उद्योजक.
–––
वारंवार खंडित वीजपुरवठ्याने कंपन्यांचे नुकसान
(उपशीर्षक)
उमाळा-नशिराबाद परिसरातील उद्योजकांकडून भरपाईची मागणी; कंपन्या बंद ठेऊन निषेध
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : उमाळा- नशिराबाद परिसरात असलेल्या सुमारे २५ कंपन्यांना वारंवार खंडति होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठा फटका बसत आहे. येथे दर तासाला वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योजक संतप्त झाले आहेत. याबाबत महावितरणकडून कोणतेही ठोस सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत उद्योजकांनी शुक्रवारी (ता.१५) कंपन्या बंद ठेवून चिंचोली उपकेंद्रावर तीव्र आंदोलन करीत निषेध व्यक्त केला.
ग्रामीण इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन लढ्ढा यांनी महावितरणला निवेदनाद्वारे भरपाईची मागणी केली आहे. यावेळी उद्योजक मुकेश दहाड, हरीश जोशी, मनोज मित्तल, निकूज बियाणी, महेश पाटील, प्रकाश पाटील आदी उद्योजकांसह मोठ्या संख्येत कर्मचारी उपस्थित होते. रोज होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याने (ट्रिपिंग) मशिनरी आणि उत्पादन प्रक्रियेत बिघाड होत आहे. कठीण परिस्थितीत कंपन्या चालवाव्या लागत असून ६०० कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी महावितरणच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मग कनेक्शन कट करा
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मशिनची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागत असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वेस्टेज निर्माण होत आहे. उत्पादन घटत असून आर्थिक नुकसान वाढत आहे. कामगारांचे पगार, बँकांचे कर्ज आणि इतर खर्च कसे भागवायचे, असा गंभीर प्रश्न उद्योजकांसमोर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन कट करून कंपन्या बंद ठेवणेच सोयीचे असल्याचे सांगत, आतापर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणी केली आहे.
चौकट
उद्योजकांच्या या आहेत समस्या
तालुक्यातील उमाळा-नशिराबाद रस्त्याजवळील विविध कंपन्यांना दररोज वीजपुरवठा खंडित (ट्रिपिंग) होत असल्याने कोट्यवधींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रमुख समस्यांमध्ये एमआयडीसीच्या तुलनेत प्रति युनिट उत्पादनात ३ रुपयाने महाग. वीज पुरवठा मिनिट टू मिनिट ट्रिप झाला की कंपनीचे नुकसान होत असल्याने कामगारांच्या पगाराची विवंचना. वीज खंडित झाल्याने प्रोसेसिंग युनिटमधील हीटिंग डिस्टर्ब होते. त्यामुळे वीजबिल जास्त येते. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे कंपनीचा चांगला कच्चामाल खराब होतो; त्यामुळे हा माल भंगारच्या भावात विकावे लागते. नुकसानीमुळे वेळेवर बँकांचे हप्ते व्याज भरू शकत नाही. तसेच बँकांचे व्याज जास्त लागते आणि उत्पादन कमी होते.