दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार
मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ ः जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे दिली आहे.
मंत्री भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिले होते. यामध्ये देशभरात सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ‘ओबीसी’च्या स्वतंत्र जनगणनेसह इतर काही महत्त्वाच्या बाबींकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधून त्यांचे पुनर्विलोकन आणि आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात मंत्री भुजबळ यांनी विविध मागण्या केल्या होत्या. या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना केली जाईल, असे स्पष्ट करून केंद्र सरकारने अधिकृत पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात वास्तव्यास असलेले घर व त्याशी निगडित मूलभूत, पायाभूत सुविधांच्या माहितीबाबत माहिती संकलित केली जाते आहे. प्रश्न क्रमांक १२ मध्ये सामाजिक वर्गीकरणासाठी केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ‘इतर’ असे तीनच पर्याय ठेवण्यात आले आहेत. इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांच्यासाठी स्वतंत्र रकान्याची कोणतीही तरतूद नाही. जनगणनेच्या अर्जामध्ये ‘ओबीसी’ या स्वतंत्र प्रवर्गाचा स्पष्ट समावेश करण्याची आग्रही मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी ३० मार्चला केली होती. त्यानुसार गृहराज्यमंत्र्यांनी जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या, शिक्षण, रोजगार यासह जातीनिहाय जनगणना करण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट केले आहे.