तीनशे गुंतवणुकदारांना तब्बल २४ कोटींचा गंडा
उपशीर्षक
‘टीडब्ल्यूजे’ कंपनीकडून फसवणूक; तक्रारदारच निघाला संशयित
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : एखाद्या गुंतवणूक कंपनीची फ्रॅन्चायझी घेतलेला व्यक्ती त्या कंपनीत गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पोलिसांत जातो. चौकशीची मागणी करून गुन्हा दाखल करण्याची तक्रारही देतो. आर्थिकविषयाशी संबंधित गुन्हा असल्याने त्याची चौकशी होऊन त्या तक्रारदारानेच सुमारे तीनशे गुंतवणुकदारांकडून २३ कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक स्वीकारून त्यांना गंडा घातल्याचे निष्पन्न होते. तक्रारदारावरच गुन्हा दाखल होतो. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सुरुवातीला तक्रार असलेला मिलिंद शालिकराव पाटील (रा. जळगाव) याच्याविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे.
असे आहे प्रकरण
मिलिंद पाटील याने पुण्यातील टीडब्ल्यूजे असो. प्रा. लि या कंपनीचे मुख्य संचालक व इतर संचालकांविरुद्ध गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारून मुदतीत परतावा दिला नाही, म्हणून तक्रार अर्ज दिला होता. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. त्यांनी कागदपत्रांद्वारे चौकशी केली असता, मिलिंद पाटील हाच गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारून त्यांना करारनामे करून देत होता. त्यात त्याला मोठ्या प्रमाणात कमिशनही मिळाले. त्यातून त्याचाच या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले.
फसवणुकीची व्याप्ती मोठी; २३ कोटींचा गंडा
टीडब्ल्यूजे असोसिएट्स व संबंधित फर्मचे संचालक, एजंटांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगची माहिती देऊन, त्यांची दिशाभूल करून, ठिकठिकाणी सेमिनार आयोजित करून सेबीच्या नियमांचे उल्लंघन करत २७९ गुंतवणूकारांकडून ११ महिन्यांसाठी २३ कोटी ८१ लाख ७२ हजार ५३० रुपये गुंतवणूक करून घेतली व त्याचा परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले.
यांच्याविरुद्ध गुन्हा
चौकशीअंती टीडब्ल्यूजे असोसिएट्सचे संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, टीडब्ल्यूजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि. चे संचालक संकेश रामकृष्ण धाग व मिलिंद शालिकराव पाटील यांच्यासह अन्य संचालक व एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मिलिंद पाटील (रा. शिवकॉलनी, जळगाव) यास अटक केली आहे. संबंधित कंपनीच्या संचालकांवर अवधूतवाडी (यवतमाळ), चिपळून (रत्नागिरी), खारघर (नवी मुंबई), वारजे माळेवाडी (पुणे शहर), श्रीनगर (ठाणे शहर), धंतोली (नागपूर), माणगाव (रायगड), एमआयडीसी सिडको (छत्रपती संभाजीनगर) अशा पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. जळगावात दाखल गुन्ह्याचा तपास अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
चौकट
अनियंत्रित ठेवी योजना बंदी कायद्यान्वये गुन्हा
हा गुन्हा अनियंत्रित ठेवी योजना बंदी कायदा २०१९ अंतर्गत दाखल झाला आहे. हा भारतात बेकायदेशीर ठेवी गोळा करणाऱ्या कंपन्या आणि व्यक्तींना रोखण्यासाठी बनविलेला एक कडक कायदा आहे. ‘अनियंत्रित ठेव’ म्हणजे अशी कोणतीही ठेवी योजना जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी किंवा राज्य सरकारसारख्या सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणीकृत नाही. व्यवसायाच्या नावाखाली पैसे गोळा करणे आणि ते परत न करणे किंवा चुकीच्या पद्धतीने वापरणे.
चौकट
अशी आहे शिक्षेची तरतूद
या गुन्ह्यात बेकायदेशीर ठेव स्वीकारल्यास दोन ते सात वर्षांपर्यंत कैद आणि तीन ते दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. ठेव परत करण्यात फसवणूक झाली, तर तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि पाच ख ते ठेवीच्या दुप्पट दंडाची तरतूद आहे. सक्षम अधिकारी फसवणूक करणाऱ्याची मालमत्ता जप्त करून ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करू शकतात.