धुळे टुडे २ साठी...
---
‘ज्ञानभारतम्’ प्रकल्पांतर्गत
राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण
नागरिक, संस्था, संशोधकांना मोहिमेत सहभागाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ ः देशाला प्राचीन हस्तलिखितांचा समृद्ध वारसा लाभलेला असून, विविध विषयांवरील ज्ञान पिढ्यान् पिढ्या हस्तलिखितांच्या माध्यमातून जतन होत आले आहे. ही हस्तलिखिते देशभरात विखुरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि अभ्यास मर्यादित राहिले आहे. या हस्तलिखिताचे अमूल्य ज्ञानसंपदेचे जतन करून ती एकत्रित स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने ‘ज्ञानभारतम्’ प्रकल्प सुरू केला आहे. या उपक्रमात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त आर. एस. कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
भारताच्या विशाल ज्ञान व संस्कृती संबंधित हस्तलिखित वारशांचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करणे आणि भावी पिढ्यांसाठी सर्व हस्तलिखितांचे एकत्रित दस्तऐवजीकरण करून त्यांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणे, तसेच जागतिक स्तरावर भारतीय ज्ञानपरंपरेचा प्रसार करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून ती राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यासक, संशोधक व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. या देशव्यापी सर्वेक्षण मोहिमेमध्ये किमान ७५ वर्ष जुनी, सर्व भाषा व लिपीमधील हस्तलिखितांचे जतन, डिजिटायझेशन आणि प्रसार करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेचा व्यापक प्रसार होऊन संशोधनाला चालना मिळणार आहे. या उपक्रमात हस्तलिखितांची मालकी संबंधित संस्था, ग्रंथालये किंवा खासगी संग्राहक यांच्याकडेच कायम राहणार आहे. या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन करण्याच्या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पिंगळे कॉम्प्लेक्स, साक्री रोड, मोगलाई, धुळे-४२४००१. दूरध्वनी क्रमांक ०२५६२-२४५७४४, ईमेल supdtest.dhl-mh@gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. कानडे यांनी केले आहे.