अवतीभवती (जागेनुसार वापरता येईल)
पीककर्ज प्रस्तावांत
वाढ; वितरण संथ
जळगाव : खानदेशात चालू हंगामात केळीसह विविध पिकांसाठी पीक कर्जाच्या प्रस्तावांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत सुमारे पाच हजार प्रस्ताव विविध बँकांकडे सादर झाले असून, त्यासाठी अंदाजे २ हजार ९०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रस्ताव राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांकडे दाखल झाले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची गरज आहे.
कारण पपई, भाजीपाला, केळी तसेच इतर पिकांसाठी खत, मजुरी आणि इतर कृषी खर्चासाठी शेतकऱ्यांना निधीची आवश्यकता आहे. याशिवाय अलीकडील वादळी पाऊस व इतर कारणांमुळे झालेल्या केळीच्या नुकसानीमुळेही अतिरिक्त भांडवलाची गरज निर्माण झाली आहे. सीबिलची अडचण राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सर्वाधिक पीक कर्ज प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, कर्ज मंजुरीपूर्वी सिबिल तपासणीची अट शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहे. याशिवाय जामीनदार आणि कर्जदारांच्या परतफेडीच्या इतिहासाचीही पडताळणी केली जात असल्याने कर्ज मंजुरीची प्रक्रिया लांबत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. खानदेशात रब्बी हंगामासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे नियोजन बँका आणि प्रशासनाने केले आहे. त्यात आता खरीप हंगामातील वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त निधीची तरतूद करावी लागणार असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. खरीप हंगामात खानदेशात साधारणपणे साडेतीन ते चार हजार कोटी रुपयांच्या पीक कर्जाची गरज असते. तुलनेने रब्बी हंगामात कर्जाची मागणी कमी असते.