सीटीबी गौरवगाथा लेख
---
NSK26H22207
कृषी विभागातील कार्याचा गौरव ः तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार, तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे आदींसमवेत डॉ. कैलाश मोते.
---
NSK26H22211
शहादा : तालुक्यातील सातपुडा परिसर आदिवासी पावरा समाज उन्नती मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. कैलाश मोते यांचा सन्मान करताना मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी.
---
NSK26H22208 (डॉ. कैलाश मोते)
---
NSK26H22213
पाणी फाउंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत कोळपांढरी गावाला प्रथम दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त झाला, त्यात डॉ. मोतेंचे योगदान महत्त्वाचे ठरले. गावाच्या गौरवाचा क्षण.
---
प्रतिकूल स्थिती, दारिद्र्याशी दोन हात करत उच्च पदापर्यंत मजल
उपशीर्षक
नंदुरबार जिल्ह्यातील डॉ. कैलाश मोतेंची यशोगाथा; कृषी क्षेत्रासाठी समर्पित कार्य
इंट्रो..
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यात एका गरीब कुटुंबात जन्म... दारिद्र्याशी नेहमीच दोन हात करत उच्च शिक्षणाचा ध्यास ठेवला. माता-पित्यांची त्याकामी साथ मिळाली... आत्याच्या घरी राहूनही ज्ञानप्राप्तीसाठी काही काळ घालवला... चांगले शिक्षण घेऊन, उच्च पदापर्यंत प्रवास करायचा हे ठरवलं होतं. पदवी, पदव्युत्तर, विद्यावाचस्पतीपर्यंतचा प्रवास... कठोर परिश्रमातून, प्रतिकूल स्थितीवर मात करत जे ठरवलं, ते मिळवलं... होय, नंदुरबार जिल्ह्यातील डॉ. कैलाश परशुराम मोते यांची ही प्रेरक यशोगाथा निश्चितच कौतुकास्पद आहे.
---
दारिद्र्याशी संघर्ष
कैलाश मोते यांचा जन्म अतिदुर्गम वडगाव गावातील कोळपांढरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) या आदिवासी पाड्यात झाला. चिंचपाणीच्या जंगल क्षेत्रात राहणाऱ्या मोते कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पूर्वी कोळपांढरी पाड्यानजिक ‘नागऱ्या’ डोंगराजवळ वन खात्यामार्फत कसण्यासाठी वनजमीन दिली जात होती. आजोबा-आजींसमवेत त्यांचे आई-वडील वनजमीन करण्यासाठी चिंचपाणी वनक्षेत्रातील शिवारात राहत होते. घरची असलेली थोडीफार शेती व मोलमजुरी हाच कुटुंबाचा व्यवसाय होता. कुटुंबात वडील, तीन काका व सात आत्या, असा मोठा परिवार.
प्रतिकूल स्थितीत उच्च शिक्षणापर्यंत मजल
कैलाश यांचे प्राथमिक शिक्षण गावापासून जवळच असलेल्या भोंगरा जिल्हा परिषद शाळेत झाले. चौथीपर्यंतचे शिक्षण आत्या मंडीबाई ठाणसिंग भामरे यांच्या घरी राहून घेतल्यानंतर श्री. महाले गुरुजी यांच्या सल्ल्यानुसार सारंगखेडा येथील शारदा विद्यामंदिरात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दहावीपर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केल्यानंतर शहादा येथील महाविद्यालयातून अकरावी, बारावीचे शिक्षण आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात राहून पूर्ण केले. कृषी महाविद्यालय धुळे येथे पदवी अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर पदव्युत्तर कृषीचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पूर्ण केले. एम.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली. तत्पूर्वी त्यांची प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ नाशिकमार्फत तळोदा पंचायत समितीत कृषी विस्ताराधिकारी म्हणून निवड झाली. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्रीय उत्पादन शुल्क तथा सीमा शुल्क येथे निरीक्षक म्हणून निवड झाली.
दोनच ड्रेस, जेवणासाठी शिष्यवृत्ती रकमेची प्रतीक्षा
आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपवर शिक्षण अवलंबून होते. आर्थिक अडचणींवर मात करून शिक्षण पूर्ण केले. धुळे येथे कृषी महाविद्यालय शिकत असताना मेसचा खर्च परवडणारा नव्हता. गावातील दहा मुलांचा क्लब पद्धतीचा अवलंब करून जेवणाचा खर्च भागवावा लागायचा. शिक्षणाच्या प्रवासात संघर्ष करावा लागला. कपड्यांचे दोनच जोड असल्याने तेच ते कपडे धुऊन वापरावे लागले. मेससाठी स्कॉलरशिपच्या पैशांवर अवलंबून राहावे लागत होते.
मित्र झोपल्यानंतर त्यांच्या नोट्सचे वाचन
नोट्ससाठी रूममधील वर्गमित्रांवर अवलंबून राहावे लागले. रुममधील मित्र झोपल्यावर त्यांच्या नोट्स वाचून परीक्षा द्याव्या लागल्या. जनरल नॉलेजचे पुस्तके, नोट्सदेखील विकत घेता येत नव्हते. प्रचंड संघर्षातून शिक्षण पूर्ण करून एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देऊन महाराष्ट्र कृषिसेवा वर्ग एक या पदावर निवड होऊन राज्याच्या कृषी विभागात अनेक पदांवर काम करण्याची संधी मिळाली.
उच्च पदांवर संधी
कैलाश मोते यांची प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत कृषी विस्ताराधिकारी म्हणून निवड झाली. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत उत्पादन शुल्क तथा सीमा शुल्क निरीक्षक म्हणून निवड झाली. दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा देऊन महाराष्ट्र कृषिसेवा वर्ग दोन या पदावर निवड झाली. त्यानंतर महाराष्ट्र कृषी वर्ग एक या पदावर १९९१ ला निवड झाली. जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनतीमुळे नोकरीत अतिउच्च स्थान गाठता आले. राहुरी येथे एमएस्सीचे शिक्षण घेत असताना एमपीएससीच्या परीक्षेत श्री. मोहन रामोळे यांनी काढलेले नोट्स, टिप्पण्या व इतर पुस्तके वाचूनच मी एमपीएससीमार्फत महाराष्ट्र कृषिसेवा वर्ग एक या पदावर निवड झाली. अभ्यासात हुशार असल्याने मला इतर विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळत गेले. महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचे अतिउच्च पद म्हणजेच कृषी संचालक पदापर्यंत मजल गाठता आली.
मुलींना उच्च शिक्षण
पत्नी सारिका मोते यांनी २०२१ मध्ये पृथ्वीतलाचा निरोप घेतला. तेव्हा त्यांच्या दोन मुलींचे शिक्षण सुरू होते. मुलींच्या लग्नाची जबाबदारी होती. संसाररथाचे एक चाक निखळले होते. अशा परिस्थितीत श्री. मोते यांनी अत्यंत धीराने परिस्थिती हाताळून मुलींचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण पूर्ण केले. राज्यातील कृषी संचालकपद सांभाळत असताना मुलींचे विवाह केले.
उत्कृष्ट सेवेची दखल
कृषी विभागात सेवा बजावताना भविष्यात येणारी आव्हाने विचारात घेतली. प्रत्येक आव्हानात्मक बाबी तपासून त्याचा सखोल अभ्यास केला. राज्यातील मंत्री, सचिव, आयुक्त यांच्यापुढे मांडून त्यांचा विश्वास संपादन केला. आव्हानांना सामोरे गेले. राज्यात कृषी वर्गातील जिल्हास्तरांपासून ते राज्यस्तरापर्यंत गेली ३५ वर्षांत एकूण १३ विविध पदांवर काम केले. प्रत्येक दिवस हा आव्हानाचा दिवस आहे, असे समजून शेतकरीहितार्थ शासनाच्या योजना राबविल्या. अत्यंत कल्पकतेने व सकारात्मक विचारसरणी डोळ्यांपुढे ठेवून राबविल्याने महाराष्ट्र राज्याने पंधरा वर्षांसाठी अतिउत्कृष्ट काम केल्याबद्दल तीन आगाऊ वेतनवाढ मंजूर केली. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे प्रभारी महासंचालक व महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणेचे प्रभारी संचालक या पदांचा अतिरिक्त पदभार दीर्घ कालावधीपर्यंत सांभाळलेला आहे. हे सर्वकाही श्री. कैलाश मोते यांची कल्पकता व सकारात्मक विचारसरणी विचार घेऊनच मिळालेले आहेत.
कृषी प्रक्रिया उद्योग उभारणार
भविष्यातील आव्हाने विचारत घेऊन मुलगा प्रध्युम्नला कृषी व्यवसाय यशस्वीपणे उभारता यावा म्हणून व सेवानिवृत्तीनंतरही शेतकऱ्यांची सेवा करता यावी म्हणून सरिताईकृपा शेतकरी उत्पादक कंपनी नंदुरबार येथे स्थापन केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उच्च तंत्रज्ञान आधारित शेती करता यावी, तसेच उत्पादित मालाला जादाचा भाव मिळावा म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग व विविध उत्पादनांची शीत साखळी उभारणीचा प्रयत्न सुरू आहे.
जीवनसाथीची भक्कम साथ
कैलाश मोते यांच्या यशात दिवंगत पत्नीची भक्कम साथ लाभली. त्यामुळे मुलींचे व मुलाचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण पूर्ण करू शकले. राज्यातील कृषीमधील सर्व पदांवर काम करीत असताना सहकारी अधिकारी, नातेवाईक व पत्नीची त्यांना उत्तम साथ लाभली. सकाळी सहाला पायी फिरण्याने दिवसाची सुरुवात होती. त्यानंतर अंघोळ करून पेपर वाचन करतात. शासनाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती देतात. रात्रीच्या वेळी मुलांचे शिक्षण व त्यांचे करिअरविषयी चर्चा करून मार्गदर्शन करतात. त्यांचे शालेय जीवनातील प्रश्न सोडवणे इत्यादी उपक्रमाने दिनक्रम पूर्ण होतो.
समाजसेवेचा वसा
शिक्षण सुरू असताना परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नोकरी करून आई-वडील, आजोबा-आजी यांच्या उपकाराची परतफेड करण्याची अपेक्षा होती. परमेश्वरकृपेने निवड कृषिसेवा वर्ग एक या पदावर झाली. उपविभागीय कृषी अधिकारी वर्ग एक या पदावर शहादा येथे कार्यरत असताना पाड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या विचारात घेतली. वन विभागाचे वनसंरक्षक श्री. थोरात यांच्या मदतीने गावातील विशेष परवानगी घेऊन दोन नालाबांध कामे वनक्षेत्रात पूर्ण केली. गावात जलसंधारण होऊन पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करून पाण्याची समस्या सोडविली. गावात एकोपा राहावा, धार्मिक वृत्ती वाढावी, यासाठी गावात हनुमान मंदिराची उभारणी केली. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात इंटरनेटचा वापर करता यावा, संगणक शिकता यावे म्हणून गावातील शाळेला एक लॅपटॉप व ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध केली. पत्नीच्या नावाने (कै.) सारिका मोते फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनमार्फत गावात सार्वजनिक उपयोगासाठी पिण्याचे पाण्याचा टँकर वडगाव गावाला उपलब्ध केला. दुसरा टँकर कैलाश मोते यांच्या सासरवाडीला म्हणजेच मौजे न्यू बोराडी (ता. शिरपूर, जिल्हा धुळे) यांना उपलब्ध करून दिले आहे. त्याचा उपयोग उत्तरकार्य, लग्नविधी व इतर कामांसाठी ग्रामस्थ मोफत वापर करीत आहेत. अशा रितीने समाजऋण फेडण्यासाठी सामाजिक कार्य सुरू केले आहे.
---
कोट
पीएच.डी.पर्यंत शिक्षणासाठी कैलाश मोते यांनी संघर्ष केला. मेहनत, जिद्द यातून यश संपादन केले. याच विचारातून नव्या पिढीस प्रेरणा मिळावी म्हणून ‘बीज अंकुरे-अंकुरे’ या आत्मचरित्र आधारित पुस्तकात त्यांचा संपूर्ण जीवनपट नोंदविलेला आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून, प्रेरणा घेऊन आपले जीवन यशस्वी करावे.
- डॉ. कैलाश परशुराम मोते,
माजी कृषी संचालक, कृषी विभाग, महाराष्ट्र
---
उत्कृष्ट कार्यासाठी समर्पित
ड्रॅग प्लॉटची नोंदणी, विश्लेषणासाठी नमुने काढणे या सुविधा देशात पहिल्यांदा जिल्हास्तरावर केल्या.
प्रकल्प अधिकारी असताना मुलांसाठी विशेष गुणवत्तावाढ अभियान राबविले. स्वाभिमान सबलीकरण योजनेतून ३२ आदिवासी शेतमजुरांना १०५ एकर जमीन वाटप केली. सैन्य व पोलिस भरती प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलिस ॲकॅडमीच्या धर्तीवर प्रशिक्षण सुरू केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ५ मुलांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून दृष्टी दिली. जमीन, आरोग्य तपासणी अभियानांतर्गत प्रथम क्रमांक मिळविला.
भात पिकांचे काढणी व उत्पादन योजनेत वाटप करून दुबार पीक पद्धतीस चालना दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत फळ पीक योजनेत महाराष्ट्राला देशात अग्रक्रम मिळवून दिला. सूक्ष्म सिंचन योजनेत दोन लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आले. ठिबकाखाली मोसंबी व संत्रा पिकाचे समूह निर्माण करण्यात यश आले.
---
कार्यावर सन्मानाची मोहोर
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीत उत्कृष्ट कार्य पुरस्कार, ऑनलाइन कार्यपद्धती पोर्टल आधारित पेमेंट पद्धतीबद्दल कृषी ॲवॉर्ड, राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत जीवनगौरव पुरस्कार, सातपुडा पावरा समाज आदिवासी विकास संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने गौरव, ॲग्रो केअर व ॲग्रो मंचातर्फे लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.