न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार
---
करण गायकर : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : तालुक्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली कालिका माता मंदिर सभागृहात बैठक झाली. तालुक्यातील विविध गावांतील बाधित शेतकरी, ग्रामप्रतिनिधी आणि समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाच्या वरिष्ठ स्तरावर केलेल्या पत्रव्यवहाराचा आढावा घेण्यात आला. शासनाकडून प्राप्त उत्तरे, कार्यवाही आणि काही सकारात्मक निर्णयांची माहिती देण्यात आली. गावनिहाय जारी झालेले आदेश, नोटिसा, हरकती आणि प्रलंबित सुनावण्यांचाही आढावा घेण्यात आला. शासनाने काही मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी रिंग रोडचे अलाइनमेंट आणि बाजारभावानुसार योग्य मोबदला या दोन मुद्द्यांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. २ जुलैनंतर होणाऱ्या वरिष्ठस्तरीय बैठकीत मांडावयाचे मुद्दे आणि प्रलंबित मागण्यांची माहिती संकलित करून शासनाला निवेदन सादर केले जाणार आहे.
करण गायकर म्हणाले, की आमचा विरोध विकासाला नाही; पण शेतकऱ्यांवर अन्याय करून विकास होऊ शकत नाही. जर शासनाने दुर्लक्ष केले तर व्यापक आंदोलन उभारले जाईल. आंदोलनासाठी प्रत्येक गावात समन्वय समित्या स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.