लोगो : विधान परिषद निवडणूक विश्लेषण
फोटो : २२१९८
शीर्षक
महायुतीच्या निवडणुकांची रणनीती ठरविणारा विजय
लीड...
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा अनपेक्षित निकाल बाहेर पडला. महायुतीकडे एकूण ६१९ पैकी तब्बल ४६६ मतदान असताना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचाच विजय होणार असे अपेक्षित होते. परंतु मतपेटीतून अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. या निकालातून नाशिकच्या राजकारणाच्या वर्तुळात नवख्या गोकुळ यांचा उदय झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाणार आहे.
-विक्रांत मते
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मिळून ४६६ मते होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे हेच विजयी होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र निवडणुकीत अपक्ष गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे मैदानात टिकले. नामांकन माघारीनंतर दोघांनी प्रचार थांबविल्याचे जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात रात्रीचा प्रचार सुरूच होता. मतदानानंतर चित्र स्पष्ट झाले. प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली, तर गोकुळ गिते यांनी थेट दराडे यांना आव्हान दिले. महायुतीची २१८ मते फुटल्याने दराडे यांचा पराभव झाला. ‘बाप काढल्यावरून’ सुरू झालेला वाद या पराभवाला निमित्त ठरला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
ताकद असूनही घसरले गणित
निवडणुकीसाठी महायुतीने पूर्ण ताकद लावली होती. भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही प्रचारात सहभाग घेतला. तरीही निकाल बदलला. यामागे अनेक कारणे दिसतात. महायुतीत शिवसेनेला जागा सुटल्यावर उमेदवारी दराडे यांनाच मिळणार हे ठरले होते; परंतु एकदा निवडून आल्यावर दराडे संपर्कात राहत नसल्याचा आरोप शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केला. शिवसेनेत गटबाजीने उग्र रूप धारण केले असून, ज्यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे होती त्यांच्याविरोधात पक्षातीलच एक गट उभा राहिला.
गिते बंधूंची रणनीती
या निवडणुकीत गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होताच गणेश गिते यांनी तयारी केली होती. पडद्यामागून सर्वच पक्षांच्या उमेदवारांना त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याची हीच वेळ होती. महायुतीकडून गणेश गिते यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आला असता; परंतु बाहेरचा उमेदवार लादल्याची भावना निर्माण झाल्याने नाराजी वाढली. गणेश गिते भाजपमध्ये असल्याने थेट महायुतीशी पंगा घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी अर्ज माघारी घेतला, तर बंधू गोकुळ यांचा अपक्ष अर्ज कायम ठेवला. गोकुळ गिते भाजपमध्ये नसल्याने त्यांना स्वतंत्र निर्णय घेणे सोपे गेले. प्रचार थांबविल्याचे जाहीर केले असले तरी कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या पाठिंब्यावर त्यांनी लढत सुरू ठेवली. महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसला तरी त्यांच्या मतदारांनी मतदान केले. महायुती आणि मविआच्या मतांवर सर्जिकल स्ट्राइक करून गिते यांनी विजय खेचून आणला.
पुढचा राजकीय मार्ग
विजयानंतर गोकुळ गिते यांनी संध्याकाळी शिवसेनेची वाट धरली. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला असता तर महायुतीत वादाची ठिणगी पडली असती. शिवसेनेचा उमेदवार पाडल्याचा आरोप होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले असते. त्यामुळे भविष्यातील राजकीय संकेत लक्षात घेऊन गिते यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या निकालाने नाशिकच्या राजकारणात गोकुळ गिते यांचा उदय झाला आहे. महायुतीच्या अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि समन्वयाचा अभाव उघड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक केवळ नाशिकपुरती मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते.