H22249
मुंबई ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महाआयटी यांच्यातील सामंजस्य कराराप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे व इतर पदाधिकारी.
--------------
मुक्त विद्यापीठाचा ‘महाआयटी’बरोबर सामंजस्य करार
---
ग्रामीणमधील ४० हजार माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना प्रशिक्षण देणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ ः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी) यांच्यात मुंबई येथे नुकताच सामंजस्य करार झाला. त्यानुसार महाआयटीचे ‘आपले सरकार’ या राज्यातील सामायिक सेवा केंद्राचे संचलन करणाऱ्या ४० हजार ग्रामीण माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना अद्ययावत शिक्षण, प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, माहिती व तंत्रज्ञान सचिव परिमल सिंह, माहिती व तंत्रज्ञान आयुक्त भुवनेश्वरी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान पाटील, मुक्त विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा. कैलास मोरे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे यांनी विद्यापीठातर्फे विशेष पूर्वतयारी, नियोजन केले होते.
नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या एक हजार २०० योजना आहेत. या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी)च्या ‘आपले सरकार’ सामायिक सेवा केंद्राद्वारे होत असते. संपूर्ण राज्यभरात असे सामायिक सेवा केंद्र संचलन करणारे तब्बल ४० हजार ग्रामीण माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक आहेत. त्यांना पूर्ण क्षमतेने तंत्रसाक्षर करणे व पूरक शिक्षण, प्रशिक्षण देण्यासाठी हा सामंजस्य करार केला आहे. मुक्त विद्यापीठातर्फे या सर्वांना डिजिटल प्रमाणपत्र शिक्षणक्रमाद्वारे ‘डिजिटल गव्हर्नन्स’च्या बारकाव्यांची माहिती देण्यात येईल. तसेच संवाद शैली, समस्या निवारण पद्धती व विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.
कोट
जनसामान्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविताना शासनाच्या विविध योजना, त्याच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे व त्यावरील उपायांची माहितीही असणे गरजेचे आहे. समाज तंत्रस्नेही होत असताना समाजातील शेवटच्या घटकांचा उत्कर्ष होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकाधिक होण्याच्या अनुषंगाने ग्रामीण माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना प्रशिक्षित केले जाईल.
- कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ