फोटो -15316
मालेगाव : वासोळ शिवारात झालेल्या पावसाने शेतात साचलेले पाणी.
----
मालेगावात पहिल्या पावसाचे आगमन
२५ मि.मी.पावसाची नोंद; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २२ : शहरासह कसमादे परिसरात सोमवारी (ता. २२) मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही परिसरात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत होते. गेल्या तीन आठवड्यांपासून तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले जात होते. सोमवारी झालेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन पारा ३५.२ अंशांवर आला. शहर व परिसरात सुमारे २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
शेती मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या होत्या. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर ताण निर्माण झाल्याने पाणीटंचाईची तीव्रताही वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस हुलकावणी देत होता. सोमवारी दुपारपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
कसमादे परिसरातील बहुतांश भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.