जिल्ह्यात टँकर फेऱ्यांचे चारशेपार
टंचाईच्या झळा : ६८१ गावे-वाड्या तहानलेल्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : लांबलेल्या मॉन्सूनमुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यात ११ तालुक्यातील ६८१ गावे-वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी १९० टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून, टँकरच्या दिवसभरात ४०१ फेऱ्या होत आहेत.
दोन दिवसांपासून जिल्ह्यात मॉन्सून डेरेदाखल झाला आहे; परंतु यंदा पावसाचा १० जूनचा मुहूर्त टळल्याने धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने घट झाली, तर गावांमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. परिणामी पाण्यासाठी जनतेला प्रशासनाच्या टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.
जिल्ह्यातील १८१ गावे, तसेच ५०० वाड्यांमध्ये सध्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी टँकर सुरू आहेत. तब्बल १९० टँकरच्या माध्यमातून हा पाणीपुरवठा होत आहे. दुष्काळाची परिस्थिती बघता दिवसभरात टँकरच्या ४०१ फेऱ्या होत आहेत. तीन लाख ३३ हजार ५४७ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ११२ टँकर सुरू होते. दरम्यान, रविवारी (ता. २१) रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पावसाचा हा लहरीपणा कायम राहिल्यास टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
चार तालुके टँकरमुक्त
जिल्ह्यात पाणीटंचाईच्या अधिक तीव्र आहेत. सद्यःस्थितीत येवल्यात सर्वाधिक ४४ टँकर सुरू आहेत, तर नांदगावला ३६, इगतपुरीत २१ व सिन्नरला २० टँकर धावताहेत. सुदैवाने नाशिक, निफाड कळवण व दिंडोरी हे तालुके दुष्काळमुक्त आहेत. दरम्यान, प्रशासनाने ७७ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. त्यातील ५५ विहिरी टँकरसाठी राखीव असून, उर्वरित विहिरींमधून गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
टँकरची सद्यःस्थिती
तालुका...........संख्या
येवला...........४४
नांदगाव...........३६
इगतपुरी...........२१
सिन्नर...........२०
मालेगाव...........१७
सुरगाणा...........१२
त्र्यंबकेश्वर...........१२
चांदवड...........११
देवळा...........०६
पेठ...........०६
बागलाण...........०५