सेकंड मेन
NSK26H22303
जळगाव : रिंगरोड येथील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकी चालक तरुणी.
...
NSK26H22304
नूतन मराठा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर साचेले पाणी.
...
NSK26H22305
पांडे डेअरी चौक येथील सिंधी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेले पाणी.
......
शहरात २५ मिनिटांच्या पावसातच दाणादाण
रस्त्यांवर साचले पाणी; वाहनधाकरांना करावा लागतोय त्रास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दिलासा देणाऱ्या पावसाचे आगमन झाले. मात्र अवघ्या २५ मिनिटांच्या जोरदार पावसानेच शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या परिस्थितीमुळे शहरातील जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
महामार्गालगतच्या समांतर रस्त्यावरील अग्रवाल चौफुली, प्रभात कॉलनी, आकाशवाणी चौक यांसह शहरातील गिरणा टाकी येथील प्रभाग समिती कार्यालयासमोरील रस्ता, मू. जे. महाविद्यालय परिसर, बहिणाबाई उद्यानालगतचा मार्ग, महाराणा प्रताप चौक, रिंगरोड, पांडे डेअरी चौक, गणेश कॉलनी रोड येथील नूतन मराठा महाविद्यालय समोर, नेहरू चौक, नवी पेठ, जिल्हापेठ, आर. आर. विद्यालयासमोरील रस्ता तसेच जुने आणि नवीन बी. जे. मार्केट परिसरात पावसाचे पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठी डबकी तयार झाल्याने वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना कसरत करावी लागली.
रस्त्यांचे कामे एकसमान नाही
शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर काँक्रिट आणि डांबरी रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांची उंची व पातळी योग्य प्रकारे न राखल्याने चौक आणि रस्त्यांच्या काही भागांत खोलगट जागा निर्माण झाल्या आहेत. परिणामी पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहून जाण्याऐवजी त्या ठिकाणी साचत आहे. काही भागांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळेही ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. यात रिंगरोड तसेच गणेश कॉलनी येथील भूमिगत गटारींसाठी खोदलेल्या रस्त्यांवर पावसाचे पाणी व चिखलामुळे अनेक वाहनधारक पडल्याच्या तक्रारी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे आल्या आहेत.
चौकट
महापालिकेने दखल घ्यावी
प्रमुख मार्गांसह शहरातील अनेक कॉलन्या व वसाहतींमध्ये काँक्रिट रस्ते तयार झालेला आहे. परंतु अनेक काँक्रिट रस्त्यांना लागून गटारी तयार केल्या नसल्याने पाणी निचराची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करणे, रस्त्यांची लेव्हल दुरुस्त करणे आणि खोलगट भागांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.