मनरेगावर २१ हजार मजुरांना रोजगार
मॉन्सूनला विलंब : पाच हजार कामे प्रगतिपथावर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : जिल्ह्यात मॉन्सून लांबल्याने ग्रामीण भागातील मजुरांसाठी मनरेगा रोजगाराचा आधार ठरली आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत जिल्ह्यात पाच हजार १६ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांवर २१ हजार २१२ मजूर राबत आहेत. सद्यस्थितीत घरकुलांची सर्वाधिक तीन हजार ९२२ कामे सुरू आहेत.
अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात यंदा मॉन्सून लांबल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा चालविण्यासाठी मजुरांची पावले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे वळत आहेत. किमान १०० दिवसांच्या कामाची हमी असल्याने मजुरांचा ओघ या कामांकडे वाढला. मजुरांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडूनही मागणीनुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत सध्या मनरेगांतर्गत पाच हजार १६ कामे सुरू आहेत. त्यात ग्रामपंचायत स्तरावर चार हजार ७२८, तर यंत्रणांच्या पातळीवर २८८ कामे प्रगतिपथावर आहेत. या कामांमध्ये घरकुलांबरोबर रस्ते, विहीर, विहीर फेरभरण, वृक्ष लागवड, कॅटल व गोटशेड, शालेय क्रीडांगण, फळबाग लागवड, गांडूळ खतनिर्मिती, वनतळे, सिमेंट नाला, शेततळे अशा विविध प्रकारच्या कामांचा त्यात समावेश आहे. जिल्हाभरात सुरू असलेल्या या कामांवर २१ हजार २१२ मजुरांना रोजगार लाभला. त्यात ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक २० हजार २६८ मजूर कार्यरत आहेत; तर यंत्रणांच्या पातळीवर सुरू असलेल्या कामांवर ९४४ मजुरांना रोजगार लाभला आहे.
दरम्यान, तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सूनने हजेरी लावली. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास मनरेगावरील मजुरांच्या संख्येत घट होण्याचा अंदाज आहे.
मनरेगावर कार्यरत मजूर
तालुका............संख्या
बागलाण............२,३६०
चांदवड............७९१
देवळा............४७
दिंडोरी............१६४
इगतपुरी............२,१२७
कळवण............१,४३६
मालेगाव............३,१७०
नांदगाव............३,०२७
नाशिक............१५४
निफाड............१,४९५
पेठ............१,१२४
सिन्नर............४९६
सुरगाणा............२,६६७
त्र्यंबकेश्वर............४६२
येवला............१,७६६