वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यू;
मखमलाबादमध्येही दोन गायी दगावल्या
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दिलासा मिळत असतानाच पशुधन हानीच्या घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी (ता. २३) इगतपुरी तालुक्यात वीज कोसळून दोन गायी व एका बैलाचा मृत्यू झाला; तर मखमलाबाद येथे विजेच्या धक्क्याने दोन गायी दगावल्याची घटना घडली.
मौजे काळुस्ते (ता. इगतपुरी) येथे झालेल्या पावसामुळे जगीराम बगाड यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, मौजे बेहेड येथे धीरज परदेशी यांच्या गट क्रमांक ११८ मधील शेतात वीज कोसळल्याने दोन गायी आणि एका बैलाचा मृत्यू झाला. या घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नाशिक शहरालगतच्या मखमलाबाद येथील पवार कॉलनीत ‘महावितरण’च्या खांबावरील तारांमधून विजेचा धक्का लागल्याने सतीश भरवाड यांच्या दोन गायींचा मृत्यू झाला.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप हंगामातील शेतीकामांना वेग येण्याची चिन्हे आहेत. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधन हानी आणि पडझडीच्या घटना घडल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकट
शेतीकामांना मिळणार गती
जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने बहुतांश भागांत समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसह विविध शेतीकामांना गती मिळणार असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तविला.