फोटो : 22363
नाशिक : राज्य शासनाचा निषेध नोंदविताना शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी.
कर्जमाफीच्या निषेधार्थ १ जुलैला
शेतकरी जाहीर करणार दिवाळखोरी
---
जिल्हा बँक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणामातीचे दिवे लावून आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य शासनाने प्रत्यक्षात फसवी कर्जमाफी दिल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या १ जुलैला जिल्हा बँक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेणामातीचे दिवे लावून शेतकरी कर्जदार आपली दिवाळखोरी जाहीर करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे यांनी दिली.
शेतकरी कर्जमुक्तीसाठी तीन वर्षांपासून धरणे आंदोलन सुरू असून, शासनाने त्याची अद्याप दखल घेतलेली नसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला. सरकारच्या शेतीविरोधी धोरणांमुळे शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
‘आमची दिवाळी निघाली, आम्ही दिवाळखोर झालो’ अशी घोषणा देत आंदोलन करण्यात येणार असून, यापुढे कोणत्याही बँकेने कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या दारात येऊ नये, असा संदेश या आंदोलनातून देण्यात येणार असल्याचे बोराडे यांनी सांगितले.
या आंदोलनात शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील, अजित नवले, देवीदास पवार, बिंदू शर्मा, दीपक पगार, साखरचंद कांकरिया, भरत दिघोळे, राजू देसले, नाना बच्छाव, निवृत्ती गारे, सुधाकर मोगल, तुषार गांगुर्डे, अर्जुन बोराडे आदींसह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.