तिसऱ्या यादीत चार हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
अकरावी प्रवेशाची उत्तर महाराष्ट्रातील स्थिती, उद्यापर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२३ : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत मंगळवारी (ता.२३) तिसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर झाली. पहिल्या दिवशी उत्तर महाराष्ट्रातून ४ हजार १८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर कोट्याच्या जागांवर ८४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यादीत निवड झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरुवार (ता.२५) पर्यंत मुदत असेल.
शालेय शिक्षण विभागातर्फे केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. यापूर्वी दोन नियमित फेऱ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. यानंतरही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त होत्या. व प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थी संख्यादेखील मोठी होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तिसऱ्या फेरीची प्रक्रिया राबविली. या फेरीची निवड यादी मंगळवारी सकाळी दहाला प्रसिद्ध करण्यात आली. व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश संधी उपलब्ध करून दिली. यादी जाहीर होताच निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे पावले वळवतांना, प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे महाविद्यालय प्रांगण विद्यार्थी, पालकांनी गजबजले होते. अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गुरुवारपर्यंत मुदत असेल. यानंतर रिक्त जागांवर प्रवेशासाठी पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
इन्फोः
नाशिक जिल्ह्यात शाखानिहाय
झालेले प्रवेश असे-
विज्ञान- ९५७
वाणिज्य- ३३४
कला- ७०८
-----------
इन्फोः
उत्तर महाराष्ट्रातील स्थिती अशी
जिल्हा झालेले प्रवेश
नाशिक १,९९९
जळगाव ९२६
धुळे ४४३
नंदुरबार ८१२