सिन्नरला स्वतंत्र उपविभागीय कार्यालय
लासलगाव, सिन्नर व नामपूर येथे अपर तहसीलदार कार्यालये
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : महसूल प्रशासनात अधिक गतिमानता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने निफाड उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून सिन्नर येथे स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लासलगाव, सिन्नर आणि नामपूर येथे नव्याने तीन अपर तहसीलदार कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे नागरिकांची महसुली कामे अधिक वेगाने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत लोकसंख्या आणि नागरीकरणात मोठी वाढ झाली असली, तरी त्या तुलनेत उपविभागीय व तहसील कार्यालयांच्या संख्येत अपेक्षित वाढ झाली नव्हती. त्यामुळे अनेक ठिकाणी एका उपविभागीय अधिकाऱ्याकडे दोन तालुक्यांचा कारभार सोपविण्यात आला होता. वाढत्या कामकाजामुळे दाखले, सातबारा उतारे, फेरफार नोंदी तसेच अर्धन्यायिक प्रकरणांच्या सुनावण्यांमध्ये विलंब होत होता. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि तळागाळापर्यंत पोहोचही त्यामुळे प्रभावित होत होती.
या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील महत्त्वाच्या महसुली प्रशासकीय रचनेत बदल करत काही उपविभागीय कार्यालयांचे विभाजन आणि अपर तहसीलदार पदांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत निफाड उपविभागीय कार्यालयाचे विभाजन करून सिन्नर येथे स्वतंत्र उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
नव्या व्यवस्थेनुसार सिन्नर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत सिन्नर तहसीलदार आणि अपर सिन्नर तहसीलदार अशी दोन कार्यालये कार्यरत राहतील. दरम्यान, नव्या उपविभागीय कार्यालयासह प्रस्तावित अपर तहसीलदार पदांच्या निर्मितीबाबत जिल्हा प्रशासनाने नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. यासाठी ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
कार्यालयांच्या संख्येत वाढ
सिन्नर उपविभागीय कार्यालयाच्या स्थापनेबरोबरच निफाड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत लासलगाव येथे अपर तहसीलदार पद निर्माण करण्यात आले आहे. तसेच बागलाण उपविभागीय क्षेत्रात सटाणा आणि नामपूर येथे स्वतंत्र तहसीलदार कार्यालये कार्यरत राहणार आहेत.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची संख्या ९ वरून १० झाली असून तहसीलदार व अपर तहसीलदार कार्यालयांची संख्या १६ वरून १९ पर्यंत वाढली आहे. महसूल प्रशासनाची ही नव्याने उभारली जाणारी यंत्रणा नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा देण्यास उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.