फोटो आहे.
पावसातच रस्ते खोदाईचा घाट
त्र्यंबकेश्वरकरांची चिखलातून वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर, ता.२३ : शहरात सोमवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारीही दिवसभर रिमझिम सुरूच होती. सायंकाळपर्यंत पावसाची संततधार कायम राहिल्याने शहरातील अनेक भागांमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यातच विविध कामांसाठी महत्त्वाचे रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते खोदल्याने या कामांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पावसामुळे कामांमध्ये दिरंगाई होणार असल्याचे स्पष्ट असतानाही घाईघाईत आराखडे सादर करून कामांना सुरुवात करण्यात आल्याची चर्चा आहे.
या कामांत रस्त्यांच्या मधोमध वीज, दूरसंचार तसेच अन्य विविध प्रकारच्या वाहिन्या टाकण्याचे नियोजन आहे. मोठ्या आकाराच्या पाइपलाइन, दोन्ही बाजूंच्या गटारी आणि इतर सुविधांसाठी रस्त्यांची रुंदी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी सध्या रस्ते खोदाईवर भर दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेली ही कामे आता पावसामुळे आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत असून, आधीच खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने कामांचे योग्य नियोजन करून पावसाळ्यातील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.