(पावसाचा फोटो येणार आहे)
जळगाव :
-------------------------------
जळगावसह परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप
------------
वातावरणात गारवा; शेतकऱ्यांत समाधान, पेरणीच्या कामाची लगबग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : मॉन्सूनचे उशिराने आगमन झाले असून, दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहरासह परिसरात बुधवारी (ता.२४) सकाळपासून तुरळक पावसाला सुरवात झाली होती. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान, दोन दिवस जिल्ह्याला वेध शाळेकडून यलो अलर्ट जाहीर केला असून, पावसामुळे शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा लागून होती. जून महिना अंतिम टप्प्यात आल्यानंतरही पावसाचे आगमन झाले नव्हते. त्यामुळे सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. दरम्यान, रविवारी (ता.२१) शहरासह काही भागांत तुरळक पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी (ता.२२) सकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली. मात्र, दिवसभर ऊन होते. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती.
तापमानात घट, हवेत गारवा
अनेक दिवसांपासून तीव्र उन्हाचा तडाखा जळगावकरांना सहन करावा लागत होता. शिवाय हवेत आर्द्रता निर्माण झाल्याने उकाड्यातही प्रचंड वाढ झाली होती. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी दिवसभर पावसाच्या रिपरिपमुळे तापमानात घट झाली असून, वातावरण आल्हाददायक बनले आहे.
पेरणीसाठी लगबग
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाअभावी पेरणी रखडली होती. शेतमशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अखेर पावसाच्या सरी बरसल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला असून, पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतात दाखल होत पेरणीची तयारी करताना दिसत आहेत.
दोन दिवस ‘यलो अलर्ट’
हवामान वेधशाळेकडून जळगाव जिल्ह्याला दोन दिवस ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दोन दिवस जिल्ह्यात विजांच्या कडकडटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.