नाशिक विभागात ११९ शेतकऱ्यांची आत्महत्या
जळगावला ६४ घटना; नाशिकमध्ये सात आत्महत्यांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : राज्य सरकारच्या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नाशिक विभागात यंदा ११९ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ६४ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास संपविला आहे. नाशिकमध्ये सात शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. सुर्दैवाने आदिवासीबहुल नंदुरबारमध्ये एकाही घटनेची नोंद नाही.
राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीवरून सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कशी उपयुक्त आहे, याचा लेखाजोखा मांडला जात आहे. विरोधकांनी कर्जमाफीच्या जाचक अटींसोबत विदर्भ व मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, विदर्भ व मराठवाड्याप्रमाणे नाशिक विभागातही शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.
विभागातील पाचही जिल्ह्यांत जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत ११९ शेतकऱ्यांनी जीवनप्रवास थांबविला आहे. म्हणजे महिन्याकाठी सरासरी २४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. या आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा, बँकांकडून कर्जवसुलीसाठीचा तगादा, दुष्काळी तसेच अवकाळीचा मारा अशा विविध कारणांचा समावेश आहे. या व्यतिरिक्तही शेतमालाचे चांगले उत्पादन झाल्यास बाजरपेठेत त्यास योग्य दर मिळत नाही. परिणामी या सर्व संकटातून येणाऱ्या नैराश्यातून शेतकरीबांधव सरतेशेवटी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. विभागात जळगावमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. धुळे व अहिल्यानगरमध्ये अनुक्रमे २५ आणि २३ शेतकरी आत्महत्यांची नोंद महसूल प्रशासनाच्या लेखी आहे. शासन शेतकरी कर्जमाफीचे भांडवल करत असले तरी विभागातील वाढत्या आत्महत्यांच्या घटना ही चिंतेत भर घालणारी गोष्ट आहे.
शेतकरी आत्महत्या
जळगाव : ६४
धुळे : २५
नगर : २३
नाशिक : ०७
नंदुरबार : ००
---
७५ प्रकरणे प्रलंबित
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारकडून एक लाखाची आर्थिक मदत दिली जाते. विभागामधील ११९ घटनांमध्ये २६ कुटुंबांना ही मदत मंजूर झाली, तर १८ प्रकरणेही सरकारी निकषात बसत नसल्याने मदत नाकारण्यात आली. तर जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर ७५ प्रकरणे प्रलंबित आहेत.