पर्यटकांनो, पर्यटनस्थळी काळजी घ्या!
मॉन्सून अलर्ट : अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : जिल्ह्यात मॉन्सून डेरेदाखल झाला आहे. पावसाच्या आगमनासोबत पर्यटकांना नाशिक शहर व परिसर तसेच ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे खुणावू लागली आहेत. पर्यटनस्थळांवर होणारे संभाव्य अपघात आणि दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
एल निनो प्रभावामुळे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात उशिराने मॉन्सून दाखल झाला आहे. मागील तीन दिवसांपासून नाशिकमध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. पावसाच्या आगमनासोबत जिल्ह्यातील गड-किल्ले, धबधबे, धरण क्षेत्र, डोंगर तसेच विविध पर्यटनस्थळांवर पावसाळी पर्यटनाकरिता जिल्ह्यासह मुंबई-पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो पर्यटक येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे छोटे-मोठे अपघात तसेच दुर्घटना घडत आहेत. त्यामध्ये नागरिक जखमी होण्यासह प्रसंगी जीव जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना
-पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे किंवा योग्य ती खबरदारी घ्यावी.
-धोकादायक व प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ नये. (उदा. प्रतिबंधित धरणे, धबधबे, जलाशये)
-माहिती नसलेल्या तसेच जोखमींची माहिती नसल्याच्या ठिकाणी जाणे टाळावे.
-गड-किल्ले, धरणे, धबधबे आदी ठिकाणी जाताना भौगोलिक माहिती घ्यावी.
-पर्यटनस्थळी अनुभवी व्यक्ती/ग्रुप अथवा स्थानिक गाइडची मदत घ्यावी.
-धोकादायक ठिकाणी छायाचित्र/सेल्फी काढणे टाळावे.
-पर्यटनस्थळी शिस्तीचे पालन करताना सुरक्षेची काळजी घ्यावी.
-ट्रेकिंग व जलाशयांच्या ठिकाणी मद्यपान, इतर मादक पदार्थांचे सेवन टाळावे.
विभागांनी करायच्या उपाययोजना
-धोकादायक ठिकाणी सेल्फी/छायाचित्रे न काढण्याबाबत फलक लावावेत.
-पर्यटनस्थळे, गड-किल्ले, धरणे, धबधब्यांच्या ठिकाणी क्षमतेनुसार प्रवेश द्यावेत.
-पोलिस विभागाद्वारे आवश्यक ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात यावा.
-पर्यटनासाठी वेळ निश्चित करताना सूर्यास्तानंतर पर्यटकांना बंदी करावी.
-पर्यटनस्थळी वाहतूक नियोजनासंदर्भात आवश्यक उपाययोजना राबवाव्यात.