नाशिकच्या ‘फॉग सिटी’कडे पर्यटकांचा ओघ
तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा योग; हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये बुकिंगला वेग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : यंदाच्या कडक उन्हाळ्यात चाळीशीपार गेलेल्या तापमानाने होरपळलेल्या नाशिककरांना अखेर पावसाने मोठा दिलासा दिला आहे. जूनचे तीन आठवडे उलटल्यानंतर मंगळवारी वरुणराजाने शहरात दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. पावसाच्या या आगमनानंतर नाशिक जिल्ह्यातील निसर्ग खुलून आला असून, सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांचा लाभ घेत राज्यभरातील पर्यटकांचा मोर्चा आता नाशिकच्या ‘फॉग सिटी’कडे वळण्याची चिन्हे आहेत.
मोहरमची सार्वजनिक सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी आत्तापासूनच नाशिकमधील पर्यटनस्थळांकडे जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. विशेषतः इगतपुरीच्या घाटमाथ्यावर पसरलेले धुके, त्र्यंबकेश्वर परिसरातील धबधबे आणि हिरवाईने नटलेले डोंगर-दऱ्या पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसरात निसर्गाची उधळण
पावसाच्या पहिल्याच जोरदार सरींनी इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसराला नवसंजीवनी दिली आहे. इगतपुरी घाटातील रस्त्यांवर आणि डोंगरकपाऱ्यांमध्ये पसरलेली धुक्याची शुभ्र चादर पर्यटकांना मोहिनी घालत आहे. तर ब्रह्मगिरी, अंजनेरी आणि आसपासच्या पर्वतरांगांमधून कोसळणारे धबधबे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
मुंबई, पुणे आणि ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने या भागाकडे येत असल्याने हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होम-स्टेचे बुकिंग वाढू लागले आहे. पर्यटन व्यवसायालाही यामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पर्यटकांसाठी प्रशासनाच्या सूचना
विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यटन विभागाने नागरिकांना सुरक्षित पर्यटनाचे आवाहन केले आहे. धबधब्यांमध्ये अतिधाडस टाळणे, वाहतुकीचे नियम पाळणे, प्रतिबंधित भागात प्रवेश न करणे तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या आगमनामुळे खुललेले नाशिकचे निसर्गरम्य रूप आणि सलग सुट्ट्यांचा योग यामुळे येत्या विकेंडला इगतपुरी व त्र्यंबकेश्वर परिसर पर्यटकांनी गजबजून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.