महसूल प्रशासनात २३७ कर्मचाऱ्यांची खांदेपालट
जिल्ह्यात समुपदेशन पद्धतीने बदल्या; सात जणांना पदोन्नती, दोघांना बढती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : जिल्हा महसूल प्रशासनात बुधवारी (ता. २४) मोठ्या प्रमाणावर खांदेपालट करण्यात आली. गट-क संवर्गातील २३७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. पसंतीच्या ठिकाणी पदस्थापना मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनातील गट-क संवर्गाच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या प्रक्रियेस अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव) व हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तहसीलदार प्रदीप वर्पे आदी उपस्थित होते.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. समुपदेशन पद्धतीद्वारे बदलीपात्र २५५ कर्मचाऱ्यांपैकी २३७ जणांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये सहाय्यक महसूल अधिकारी संवर्गातील ६५ पैकी ५८, मंडळाधिकारी संवर्गातील २७ पैकी २१ आणि महसूल सहाय्यक संवर्गातील ८६ पैकी ८५ कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. याशिवाय ६७ ग्राममहसूल अधिकारी आणि सहा वाहनचालकांच्या बदल्याही पूर्ण करण्यात आल्या.
काही कर्मचाऱ्यांना अपेक्षित ठिकाणी नियुक्ती न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला. मात्र, रिक्त पदे भरणे, मनुष्यबळाचे संतुलन राखणे आणि नागरिकांना अधिक गतिमान व पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने बदली धोरणाची अंमलबजावणी करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
दोघांना मंडळाधिकारीपदी बढती
बदली प्रक्रियेसोबतच पदोन्नतीची कार्यवाहीही पूर्ण करण्यात आली. सहाय्यक महसूल अधिकारी पदावर कार्यरत सात कर्मचाऱ्यांना ग्राममहसूल अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली. तसेच दोघांना मंडळाधिकारीपदी बढती मिळाली. मंडळाधिकारी संवर्गातून सहाय्यक महसूल अधिकारीपदी अदलाबदलीने एका कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात आली. दरम्यान, बदल्यांपूर्वी प्रशासनाने प्राथमिक यादी प्रसिद्ध करून हरकती मागविल्या होत्या. प्राप्त हरकतींची पडताळणी करून त्रिस्तरीय सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर अंतिम यादी निश्चित करून समुपदेशनाद्वारे कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्यात आल्या.