धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 12817
धुळे : पावसामुळे जिल्हा रुग्णालयात साचलेले डबके.
--
पावसामुळे सिव्हीलला ‘बत्ती गुल’
-
मुख्य प्रवेशद्वाराजवळ डबके; रुग्ण, नातेवाइकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २४ : शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंडित होण्याचे समीकरण या वर्षीही कायम आहे. यात साक्री रोडवरील स्थानिक जिल्हा रुग्णालयही (सिव्हील) याला अपवाद ठरलेले नाही. शहरात बुधवारी (ता. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास पाऊस सुरू होताच रुग्णालयाची ‘बत्ती गुल’ झाली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मन:स्ताप सहन करावा लागला. दरम्यान, रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पावसाचे पाणी साचून डबके तयार होत असल्याने रुग्णांना आत जाताना कसरत करावी लागत आहे.
रूग्णालयातील गंभीर समस्यांकडे आमदारांसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, वीज महावितरण कंपनी, रुग्णालय प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या अडीच आठवड्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुळे शहरासह ग्रामीण भागात समाधानकारक पाऊस होत आहे. परंतु, दरवर्षीप्रमाणे पाऊस सुरू झाला की वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार महावितरणकडून यंदाही ‘जैसे थे’च आहे.
-
वीजपुरवठा खंडीत
बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास धुळे शहरात पावसाची सर आली आणि जिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाला. यामध्ये अपघात विभाग (कॅज्युअल्टी) आणि अतिदक्षता विभागाचाही (आयसीयू) समावेश होता. ऐन धावपळीच्या वेळीच अंधार झाल्याने रुग्णांसह डॉक्टरांचीही चिंता वाढली होती. पाऊस सुरू झाला की वीज गायब होण्याचा हा प्रकार नेहमीचाच झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सर्वसामान्य रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी किमान जिल्हा रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी तरी अखंडित वीज पुरवठा ठेवावा, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.
-
डबक्याचे स्वरूप
जिल्हा रुग्णालयाला पाणी साचण्याच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने येथे मोठे डबके साचते. त्यामुळे रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका, रिक्षा किंवा पादचाऱ्यांना चिखल आणि पाण्यातूनच ये- जा करावी लागते. या समस्येचा निपटारा करावा, अशी मागणी आहे.