धुळे : टुडे पान ३ साठी..मेन
--
फोटो क्रमांक : 22493 - एआय इमेज
--
मॉन्सूनच्या खंडामुळे खरिपाचे कोलमडले वेळापत्रक
--
जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे पेरण्या विलंबाने; मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : लांबलेल्या मॉन्सूनमुळे आणि पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील खरिपाचे पारंपरिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. यंदा मॉन्सूनने सुरुवातीलाच तब्बल तीन आठवडे ओढ दिल्यामुळे बळीराजा मोठ्या चिंतेत पडला होता. अखेर मृग नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावली असली तरी या लहरी चित्रामुळे जिल्ह्यातील खरीप पेरण्या विलंबाने आणि संथ गतीने सुरू आहेत. जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ २३.५ टक्के (२२.८ मिमी) इतकाच पाऊस नोंदवला गेला आहे. या खंडामुळे व अपुऱ्या पावसामुळे खरिपाचा वेग मंदावला असून, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ५५ हजार २४ हेक्टर क्षेत्रावरच प्रत्यक्ष पेरणी पूर्ण होऊ शकली आहे.
तीन आठवड्यांच्या मोठ्या खंडानंतर आलेल्या पहिल्या पावसाने जिल्ह्यातील रखडलेल्या पेरण्यांना काहीशी गती दिली आहे. या लहरी व प्रतिकूल परिस्थितीतही जिल्ह्यातील बळीराजाने यंदा ‘पांढऱ्या सोन्यावर’ अर्थात, कापूस पिकावरच सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. जिल्ह्यात झालेल्या ५५ हजार २४ हेक्टर पेरणीपैकी ४५ हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावर एकट्या कापसाची लागवड झाली आहे. तालुकानिहाय विचार केल्यास धुळे तालुक्यात सर्वाधिक २१ हजार ६४८ हेक्टर, शिरपूरमध्ये नऊ हजार ७२१ हेक्टर, साक्रीमध्ये सात हजार ७५० हेक्टर तर शिंदखेडा तालुक्यात सहा हजार ५७९ हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरा झाला आहे. धान्य पिकांमध्ये मक्याची आठ हजार ७४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, यात धुळे आणि शिरपूर तालुके आघाडीवर आहेत. बाजरीचा पेरा केवळ ३०० हेक्टर तर ज्वारीचा पेरा अवघ्या २६ हेक्टरवर आहे. सुरुवातीचे तीन आठवडे मॉन्सून पूर्णपणे गायब असल्यामुळे आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे सोयाबीन आणि कडधान्यांच्या पेरण्या अद्याप पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकरी या पिकांच्या पेरणीसाठी मोठ्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. याशिवाय जिल्ह्यात तूर १३७ हेक्टर, मूग ४० हेक्टर आणि सोयाबीन अवघ्या ५७ हेक्टर क्षेत्रावर पेरले गेले आहे. साक्री आणि शिंदखेडा या तालुक्यांमध्ये अजून सोयाबीनच्या पेरणी नोंद झालेली नाही.
-
१४-१
..चौकट..
१४-१
मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात यंदा जून महिन्यामध्ये पावसाची कमालीची विषमता आणि असमानता पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ २३.५ टक्के (२२.८ मिमी) इतकाच पाऊस नोंदवला गेला आहे. यात शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक ३६.३ टक्के (३२.८ मिमी) पाऊस झाला असून, तेथील शिंदखेडा मंडळात ५३.३ मिमी पावसाची नोंद आहे. धुळे तालुक्यात २४.३ टक्के पाऊस झाला असून, शिरूड आणि बोरकुंड मंडळात सरासरी अधिक आहे. मात्र, सोनगीर, कुसुंबा आणि खेडे भागात पावसाने दांडी मारली आहे. शिरपूर तालुक्यात १६.८ टक्के पाऊस नोंदवला गेला. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस होणाऱ्या साक्री तालुक्यात आतापर्यंत अवघ्या १४.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात पिंपळनेर मंडळात ५७.६ मिमी पाऊस झाला असला तरी अन्य मंडळात मात्र असमाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या लहरी आव्हानामुळे पेरण्या खोळंबल्या असून, खरीप हंगाम वाचवण्यासाठी जिल्ह्याला आता पुढील काही दिवसांत मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.